जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : विविध कार्यक्रमांनी जलजागृती सप्ताहाला सुरूवातगोंदिया : माणसाला सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीचे महत्व नसते. पाणी हे सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याचेसुध्दा महत्व माहीत नाही. भविष्यात पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने न केल्यास भीषण जलसंकटाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, असा सल्लावजा इशारा जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिला.तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या वैनगंगा नदी काठावरील कवलेवाडा बॅरेज येथे बुधवारी जलजागृती सप्ताहाचे जलपूजन करु न उद्घाटन केल्यानंतर डॉ.सूर्यवंशी बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार भजनदास वैद्य, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, पंचायत समितीच्या सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ. किशोर पारधी, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, राजलक्ष्मी तुरकर, कैलास पटले, मिना बिसेन, सुनीता मडावी, प्रिती रामटेके, रजनी कुंभरे, पंचायत समिती सदस्य प्रवीण मेश्राम, मनोहर राऊत, नीता रहांगडाले, माया शरणागत, डॉ.रहांगडाले, पवन पटले, कवलेवाडाच्या सरपंच श्रीमती पारधी, कार्यकारी अभियंता यासतवार, नरेंद्र ढोरे, निखारे, गेडाम, छप्परघरे, उपविभागीय अधिकारी महिरे तहसीलदार चव्हाण, नायब तहसीलदार कोकवार यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, यावर्षीच्या जलदिनाची संकल्पना पाणी आणि नोकरी यावर आधारीत आहे. जगातील १५० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही पाण्याशी संबंधित व्यवसायाशी निगडित आहे. जिल्ह्यात सिंचनातून कृषी क्रांती घडविण्याची क्षमता धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. ही सिंचन क्षमता पूर्ण होताच जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांनी सिंचनाची सुविधा लक्षात घेता नगदी पिकाकडे वळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे बीलसुध्दा वेळेत भरले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविकातून अ.अभियंता नार्वेकर म्हणाले, राज्यातील काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पाण्याची बचत करणे काळाची गरज झाली आहे. शेती, घरी आणि व्यवयायासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. ेप्रत्येकाने जलजागृती सप्ताहात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन त्यांनी केले. कार्यक्र माला विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच कवलेवाडा परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी मनोज दाढी व त्यांच्या कलावंतांनी जलजागृतीपर पथनाट्य सादर करु न जलसाक्षरतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन दुलीचंद बुध्दे यांनी तर आभार विलास पाटील यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)पाटबंधारे विभागाची रॅलीजलजागृती सप्ताहांतर्गत दि.१६ ला दुपारी १२ वाजता सुभाष गार्डनसमोरील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. यात मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया, बाघ इडियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया व गोंदिया पाटबंधारे विभाग तसेच लघुसिंचन (जलसंधारण) विभागातील तथा जिल्ह्यातील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. दुपारी २ वाजता या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप करण्यात आला. त्यांना कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम यांनी जलप्रतिज्ञा देऊन पाण्याचे महत्व सांगितले.जिल्हा परिषदेत जलपूजन जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य कार्यपालन अधिकारी डी.बी.गावडे यांच्या हस्ते जलपूजन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, सभापती देवराज वडगाये, सभापती विमल नागपुरे, ज्येष्ठ जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पाण्याचा योग्य वापर न केल्यास पुढील पिढीला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, असे यावेळी राजलक्ष्मी तुरकर म्हणाल्या.
पाण्याचा वापर काटकसरीने व जबाबदारीने करा
By admin | Updated: March 17, 2016 02:29 IST