अर्जुनी-मोरगाव : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या शेकडो मजुरांना दोन वर्षांपासून बोनस मिळाला नाही. येत्या १५ दिवसांत बोनस दिला गेला नाही तर कोहमारा येथील वन कार्यालयावर मजुरांसह धडक मोर्चा काढला जाणार असल्याचे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी वनविभागाला दिले आहे.
शेंडा, सहाकेपार, पांढरवाणी, आपकारीटोला, मसरामटोला व परिसरातील अनेक गावांत उन्हाळ्यात तेंदूपत्ता तोडणी होते. ग्रामीण भागात लहान लेकरांसह अख्खे कुटुंब अगदी पहाटेपासून जंगलात जाऊन तेंदूपानांची तोडणी करतात. अनेकदा त्यांना वन्यश्वापदांचा सामनासुद्धा करावा लागतो. तेंदूपत्ता तोडणी करणाऱ्या मजुरांना बोनस देण्याचे शासनाचे धोरण आहे. २०१९ पासून परिसरातील सुमारे ४०० ते ५०० मजुरांना बोनसच दिला गेला नाही, अशी मजुरांत खदखद आहे. हा एकप्रकारे शासनाच्या धोरणाचा भंग आहे. मजुरांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याने उपासमार होत आहे. एकतर परिसरात शेती व्यवसायाशिवाय इतर दुसरे रोजगाराचे साधन उपलब्ध नाही. कोरोनासारख्या संकटकाळात हक्काचे पैसे मिळत नसल्याने मजुरांची ही थट्टाच आहे. येत्या १५ दिवसांत मजुरांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यास परिसरातील सुमारे ५०० मजूर कोहमाराच्या वन कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असून, परशुरामकर यांनी वनसंरक्षकांना यासंदर्भात पत्र दिले आहे.