गोंदिया : मागील दोन वर्षात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. सन २०१९ मध्ये भारतात १.३९ लाख लोकांनी आत्महत्या केली. पुढे २०२० मध्ये त्यात वाढ होऊन सुमारे १.६७ लाख लोक आत्महत्येचे बळी पडले. हे प्रमाण चिंताजनक आहे. या आत्महत्या करणाऱ्या नागरिकांमध्ये ७० टक्के प्रमाण हे ३० ते ४५ वर्षे या तरुण वयोगटातील होते. त्यामुळे जागतिक महासत्तेचे स्वप्न बघणाऱ्या भारत देशाची तरुण पिढी नैराश्याने जर आत्महत्या करीत असेल तर त्यावर मंथन करणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याने सरकारतर्फे जिल्हा पातळीवर मानसिक उपचार आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या मानसिक आरोग्य समुपदेशनाचा लाभ घ्या, असे प्रतिपादन येथील केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आरोग्य प्रशासनामार्फत दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळत जनजागृती करण्यात येते असून यानिमित्त येथील कुंभारेनगरातील अर्बन हेल्थ सेंटरमध्ये आयोजित जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारेनगर यूपीएससीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार वालेच्छा, नर्सिंग ऑफिसर रूपाली टोणे, समुपदेशक इंदूरकर व सुरेखा आझाद आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. हुबेकर यांनी, बहुतांश आत्महत्येचे कारण तपासले तर आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, व्यसन, नैराश्य, कौटुंबिक कलह आदी दिसून आले आहेत. त्यासाठी सुजाण नागरिकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे. या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजात असहायता, एकांतवास, अनिश्चितता, आर्थिक ताणतणाव, बेचैनी व नात्यातील दुरावा वाढला आहे. परिणामी चिंता, नैराश्य व झोपेचे विकार वाढले आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊन आत्महत्या वाढत आहेत. यावर प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य असून यासाठी वैद्यकीय सल्ला हवा असेल त्यांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर आपले समुपदेशन करून घेतले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाला रुग्ण व त्यांचे नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.