गोंदिया : अर्थव्यवस्थेला रोखरहीत करण्यासाठी डिजीटल पध्दतीने आर्थिक व्यवहार करण्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील शिधावाटप दुकानामध्ये शिधावस्तुची किंमत अदा करण्यासाठी मोबाईलद्वारे रक्कम हस्तांतरण व ई-वॉलेट या सुविधेचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. मात्र सध्या त्यात अनेक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना शिधावस्तुचे वितरण करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ही कार्यवाही शिधावस्तू खरेदी करताना रोख रक्कम रास्तभाव दुकानदारास देतात. शासन निर्णयानुसार यु.एस.एस.डी. व ई-वॉलेट पध्दतीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानातून शिधावस्तूची उचल जानेवारी २०१७ पासून करावी लागणार आहे. सर्व रास्तभाव दुकानदारांनी त्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत त्वरित काढावे व आपला मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न करु न घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र काही रेशन दुकानदारांनी या प्रणालीला हरकत घेत मशिनचे, विद्युतचे भाडे सरकारने द्यावी अशी मागणी केली आहे. नवीन प्रणालीनुसार प्रत्येक रास्तभाव दुकानात कॅशलेस व्यवहाराबाबतचा फलक प्रदर्शित करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रास्तभाव दुकानातील शिधावस्तुची विक्री पी.ओ.एस.द्वारे करण्याचे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदारांनी व शिधापत्रिकाधारकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गोंदिया यांनी केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
स्वस्त धान्य दुकानातून लवकरच डिजिटल व्यवहार
By admin | Updated: December 30, 2016 00:55 IST