गोंदिया : ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या असून, शहरी भागातील शाळा सुरू करण्याची लगबग सुरू आहे. वर्ग ८ ते १२ वी च्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात ३७९ शाळा असून, यापैकी ३३५ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी ३३६ ग्रामपंचायत समितीने ठराव दिलेला आहे. ४३ शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला नाही.
शाळा सुरू झाल्या तरीही काही शिक्षकांचे लसीकरण न झाल्याने कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन विभागांतील २३५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप झाले नाही. जिल्ह्यातील इयत्ता ८ ते १२ वीच्या ४४ शाळा आतापर्यंत सुरू झाल्या नाही. ज्या शाळा सुरू झाल्या नाही त्या शाळांच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला नाही. काही ग्रामपंचायत खासगी शाळांच्या संचालकांना शाळा सुरू करण्याचा ठराव देण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत.
....................
जिल्ह्यात ३३५ शाळा सुरू
- गोंदिया जिल्ह्यात वर्ग ८ ते १२वीच्या आश्रमशाळा व नगर परिषद क्षेत्रातील शाळा वगळून ३७९ शाळा आहेत.
- ग्रामपंचायत समितीचा ठराव घेतलेल्या शाळांची संख्या ३३६ आहे. यापैकी ३३५ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत.
- माध्यमिक विभागाच्या ११५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही.
....................
सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेचे सॅनिटायझेशन करण्यात यावे अशा सूचना देण्यात येतात. परंतु, संपूर्ण शाळेचे सॅनिटायझेशन करण्यासाठी हजारो रुपये लागतील व हे पैसे कोण देणार? शाळेच्या सॅनिटायझेशनचा खर्च मुख्याध्यापक व शिक्षकांच्याच माथी मारला जात आहे.
.........
तोंडी आदेशांमुळे मुख्याध्यापकांसमोर पेच
शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत समितीचा ठराव लागतो. परंतु, ज्या ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याचा ठराव दिलेला नाही आणि शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यावर जोर देत असेल तर या दोघांच्या मध्यात मुख्याध्यापक अडकत आहे. मुख्याध्यापकाने काय करावे हे त्यांना सूचत नाही.
...............
४४ शाळा बंदच
इयत्ता ८ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश आहेत. या आदेशानुसार ग्रामीण भागातील ३३५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अजूनही ४४ शाळा सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे त्या शाळांत शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
...............
उपशिक्षणाधिकारी म्हणतात...
ग्रामपंचायत समितीचा ठराव घेतल्यावर शाळेचे सॅनिटायझेशन करून शाळा सुरू करण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यापैकी ३३५ शाळा सुरू करण्यात आल्या, तर ठराव न मिळाल्यामुळे ४४ शाळा सुरू करण्यात आल्या नाही. ग्रामीण भागातील शाळा सुरू असून, शहरी भागातील शाळा बंद आहेत.
- प्रदीप समरीत, उपशिक्षणाधिकारी, गोंदिया.