कालीमाटी : ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया सात महिन्यापूर्वी मतदानाने घेण्यात आली. परंतु सात महिने लोटूनही मतपेढीला कुलूप लावले आहे. या प्रकरणी प्रशासनाविरोधात गावकऱ्यांमध्ये रोष आहे. तहसील कार्यालय व पोलीस ठाणे आमगाव अंतर्गत ग्राम पंचायत माल्ही येथे अनेक महिन्यापासून महात्मा गांधी तंटामुक्त समितीची निवड प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे गावातील तंटे विकोपाला जात आहेत. तरी देखील तहसीलदार, पोलीस निरीक्षक व खंडविकास अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावात शांतता प्रस्थापित करून गावातील वाद गावातच मिटविले जावे यासाठी तऽटामुक्त गाव समित्या गावागावात तयार करण्यात आल्या. परंतु येथील प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सदर योजना धुळीस मिळत आहे. ग्राम पंचायत माल्ही येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष व समिती नेमण्याकरीता १० सप्टेंबर २०१५ रोजी गुप्त मतदान घेण्यात आले. ५० गावात तेढ निर्माण झाल्याने सदर पेढी सात महिन्यापासून सीलबंद आहे. ती पेढी ग्राम पंचायत कार्यालय सुरक्षित असून तहसीलदार व पोलीस निरीक्षक गावात केव्हा येणार याची प्रतिक्षा गावकऱ्यांना आहे. गावात तंटामुक्त समिती नसल्याने गावात होणारे किरकोळ तंटे, जमिनीवरून होणारे वाद, दारूबंदी, व्यसनमुक्त सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम थंड बस्त्यात आहेत. यामुळे नागरिकांचे मानसिक, आर्थिक नुकसान होत आहे. माल्ही येथील छोटेमोठे वाद पोलिसात दाखल होत असून नागरिकांना न्यायालय प्रक्रियेचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. माल्ही येथील नागरिकांनी अनेकदा तहसीलदार, पोलीस निरीक्षक, खंडविकास अधिकारी यांना निवेदन देवूनही अध्यक्ष व समिती निवड प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली. गोंदिया जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त मोहीमेत राज्यात पहिला ठरला. पण माल्ही ग्रा.पं.याला अपवाद ठरत आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी दखल घेवून अध्यक्ष व समितीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
तंमुस अध्यक्षाचा निकाल सात महिन्यांपासून कुलूपबंद
By admin | Updated: July 17, 2016 00:20 IST