गोंदिया : शहरातील समस्या सोडविण्यासाठी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शहर व शहराबाहेरून ये-जा करणाऱ्या महिलांसाठी बाजार परिसरात व रेल्वे स्थानक परिसरात महिला शौचालय नाही. त्यामुळे महिलांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यामुळे त्वरित शहरात महिला शौचालय बनविण्यात यावे.रामनगर परिसरातील मोठ्या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे. या तलावाची खोली कमी असल्यामुळे थोड्याशा पावसात तलाव भरतो व रिंग रोड परिसरात पूर येतो. गजानन कॉलनी, एनएमडी कॉलेज व रिंग रोड परिसरातील लोक पूरपीडित आहेत. घाण पाणी घरात जमल्यामुळे अनेक आजारांना वाव मिळतो व दुष्परिणाम लहान बालकांवर होतो. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी व गोंदिया शहर स्वच्छ व निर्मल बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे आदी बाबींचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सेवा संस्थेचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, उपाध्यक्ष मनिष तिवारी, सचिव सविता तुरकर, मकसूद खान, गुलाब ठाकूर, हरिकेश चौधरी, शैलेश ठाले, अहमद मणिहार, रिना रहांगडाले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहराच्या समस्येकडे लक्ष द्या
By admin | Updated: May 28, 2015 01:14 IST