अर्जुनी-मोरगाव : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांना साथीचे अनेक आजारांची संभावना बळावते. चारा, पाणी आणि गोठ्यातील ओलसर वातावरणामुळे जनावरे आजारी पडतात. जनावरांमध्ये पोटातील जंतांचे प्रमाण वाढून आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे लाखो रुपयांचे गोधन धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गोपालकांनी साथरोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आवाहन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे पशुधन पर्यवेक्षक सुखदेव राऊत यांनी केले.
तालुक्यात शेतीला पर्याय म्हणून शेतकरी गाई, म्हशी आणि शेळीपालन करतात. या जनावरांचे आरोग्य सुदृढ राहिले तर गोपालकांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती बदलेल. पावसाळ्यात साथीचे रोग बळावतात. या रोगांनी जनावरे दगावण्याची शक्यता असते. शासन लसीकरण मोहीम राबवते, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करावे, असे राऊत यांनी कळविले आहे.