लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : नुकत्याच सरपंच पदाच्या झालेल्या आरक्षण सोडतीत धाबेटेकडी ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीवर अन्याय झाल्याने येथील देवाजी कुंभरे यांनी या आरक्षणावर हरकत घेतली आहे. प्रशासनाने सतत होणाऱ्या या अन्यायाची दखल घेऊन आरक्षणात बदल करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. २८ जानेवारी) काढण्यात आली. यात २००५पासून प्रत्येक ग्रामपंचायतींचा सरपंच पदाचा आरक्षण घोषवारा तयार करण्यात आला. त्यानुसार २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंचांचे आरक्षण ठरविण्यात आले. धाबेटेकडी ग्रामपंचायतीमध्ये २००५ ते २०१०करिता सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता राखीव असल्याचे घोषवाऱ्यात दाखवले गेले, प्रत्यक्षात ते सर्वसाधारणकरिता राखीव होते. यामुळे २०१० ते २०१५, २०१५ ते २०२० आणि २०२० ते २०२५मध्येही सतत चुका होत गेल्या. यामुळे अनुसूचित जमातीचे आरक्षण निघालो नाही. हा घोषवारा प्रशासनाकडून तयार करण्यात आला असून, तो चुकीचा आहे व हा घोळ घोषवारातील चुकीमुळे झाला आहे. यावर कुंभरे यांनी आक्षेप घेतला असून, तातडीने यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.