नाना पटोले : जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचे अधिवेशन अर्जुनी-मोरगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र संघटनेशिवाय उद्धार नसून संघटीत राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. जिल्हा पेंशनर्स असोसिएशनच्यावतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजीत जिल्हास्तरीय अधिवेशन व ८० वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, गटशिक्षणाधिकारी पी.बी. भेंडारकर, गट विकास अधिकारी एन.आर. जमईवार, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, झाडीपट्टी कवयीत्री अंजना खुणे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सर्वप्रथम मृत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्तावीकातून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष स.जू.कटरे व तालुकाध्यक्ष डी.बी.बोरकर यांनी असोसिएशनच्या राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील मागण्या मांडल्या. या अधिवेशनाला जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १७३४ सभासद उपस्थित होते.यात ८० वर्षे पूर्ण झालेल्या ७५ सभासदांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन एस.एम.नरूले यांनी केले. आभार दे.मो.मानकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी असोसिशएनच्या जिल्हा व तालुकास्तरावरील सभासदांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
संघटित राहणे काळाची गरज!
By admin | Updated: March 27, 2017 01:00 IST