काचेवानी : शेतकर्यांच्या शेतात उत्पन्नात वाढ व्हावी, पाण्याची समस्या दूर व्हावी, पीक येईपर्यंत पाणी साचून राहील या उद्देशाने शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांमुळे शेतकरी सुखावले आहेत.पाणलोट प्रकल्प हे शेतकर्यांकरिता वरदान आहे. मात्र पाणलोट प्रकल्पाचा लाभ गरजवंत शेतकर्यांना मिळत नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागांतर्गत शेतकर्यांकरिता संयुक्तरीत्या विविध योजना राबविण्यात येत आहे. यापैकी काही योजनाचा लाभ शेतकर्यांना मिळतो तर काही शेतकर्यांना मुद्दाम मिळत नाही. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणार्या पाणलोट क्षेत्र हे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरला आहे. काही ठिकाणी यापूर्वी निदर्शनात आले होते की, या योजनेचा लाभ गरजवंताना सोडून काही स्वार्थी प्रवृत्तीच्या कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी या योजनेचा लाभ देताना पदाचा दुरुपयोग करतात. वास्तविक पाहता पाणलोट क्षेत्र प्रकल्पाची उद्दिष्टामध्ये पाणलोट विकासाच्या माध्यमातून निर्माण होणार्या कृषी आधारित स्वयंरोजगाराच्या संधीद्वारे समाज घटकांची आर्थिक उन्नती साधने, ग्रामसभेच्या सहभागातून, लोकसहभागातून आणि संमतीने स्थानिक परिस्थिती व नैसर्गिक तसेच उपलब्ध पायाभूत संसाधनाचा विचार केल्यानंतर प्रकल्पाचा नियोजन करणे, स्वयंरोगाराकरिता दीर्घकालीन काम व संसाधनाचा नियोजन करणे हे सुध्दा पाणलोट क्षेत्राचे उद्दिष्ट आहे. पाणलोट विकास कार्यक्रमाबरोबर पाणलोट क्षेत्रातील शेतकर्यासाठी, भूमिहीन, शेतमजूर महिलांच्या उदरनिर्वाहाची साधने निर्माण करण्यासाठी नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे पाण्याच्या ताळेबंदाविषयी जनजागृती करणे, सक्षमतेने पाण्याचा वापर करण्याच्या संदर्भात प्रबोधन करणे, दीर्घकालीन शाश्वत रोजगार निर्मितीवर भर देणे, कृषी आधारित अर्थव्यवस्था बळकट करणे त्याचबरोबर वेगवेगळ्या शेती पद्धतीत जसे कृषी शोधत पशुधन विकास, कृषीसोबत फलोत्पादन विकास आणि कृषीसोबत दुग्ध व्यवसाय इत्यादीची अंमलबजावणी करणे व दीर्घकालीन शाश्वत देखभाल दुरुस्ती कायमस्वरुपी सहभागी पद्धतीने करण्याकरिता पाणलोट निधी उभारणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट्ये आहेत. पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंतर्गत शेततळे तयार करणे, बांध्यावर माती पुरवण्यासहीत अनेक कामे शेतकर्यांना दिल्या जात आहेत. शेतकर्यांकरिता या योजना हिताच्या असल्या तरी योजनेचा लाभ सर्वच शेतकर्यांना मिळेल, असे दिसून येत नाही. पाणलोट समिती ही गाव स्तरावर तयार केलेली असल्याने समितीचे सचिव हे गावातील असल्याने यात पक्षपात होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. लाभार्थी नावाची निवड करणे आणि त्याचा शिक्कामोर्तब करणे हे पाणलोट समितीचे सचिव व अध्यक्षाला असल्याने यात गरीब व मध्यम वर्गाच्या शेतकर्यांना याचा पूर्णपणे लाभ मिळेल, यात शंका व्यक्त करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्र हे प्रकल्प शेतकर्यांच्या हिताचे असले तरी हे २०१४ हे वर्ष शेवटचे असून ही योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. पाणलोट क्षेत्राच्या प्रकल्पातून पाहिजे तसा विकास शेतकर्यांचा झालेला नाही. (वार्ताहर)
पाणलोट प्रकल्पाच्या लाभापासून गरजू वंचित
By admin | Updated: May 20, 2014 23:44 IST