गोंदिया : अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. त्यामुळे हातची पिके यंदाही गमवावी लागणार या चिंतेत शेतकरी होता. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात परतून आलेल्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. येथे सांगायचे झाल्यास मागील वर्षीची अतिवृष्टी व रबी हंगामातील गारपीट शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी पुरी आहे. मात्र जिल्ह्यातला शेतकरी जन्माला आल्यापासून या परिस्थितींचा सामना करीत मातीतून सोनं काढत असल्याने त्याला निसर्गाच्या या खेळाची सवय जडली आहे. त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीशी निपटून घेत येथील शेतकरी धानाचं वाटं कधीच रित होऊ देत नाही. यंदा खरीपाच्या हंगामातही पावसाने सुरूवातीपासूनच खेळी केली. उशीरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढविले. मात्र शेतकऱ्या आहे त्या परिस्थितीचा सामना करीत शेती केलीच. येथील कृषी विभागाने २८ आॅगस्ट पर्यंतची दिलेली रोवणीची आकडेवारी बघता जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी झाली होती. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात भातपिकाची रोवणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्व साधारण क्षेत्र आहे. मात्र यंदा एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली आहे. आजपर्यंत त्यात अधिक भर झाली असावी. मात्र पिकं आता पाचरे फुटण्याच्या स्थितीत आले असून त्यांना पाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मात्र वेळीच पावसाने दडी मारल्याने हाती आलेली पिकं गमावण्याची भिती शेतकऱ्यांना जाणवत होती व त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त होता. अशात ऐनवेळी निसर्गाने साथ दिली व मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली. परतून आलेल्या या पावसाने पिकांची तहान भागविली असून त्यांना जीवदान दिले आहे. यामुळे शेतकरीही सुखावला असल्याचे बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)
पावसामुळे पिकांना जीवदान
By admin | Updated: September 8, 2014 00:37 IST