गोंदिया : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही. तेव्हा गावपातळीवरील गरजू लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शुक्रवारी (दि.१५) सडक-अर्जुनी पंचायत समिती सभागृहात महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. सभेला पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी लोकरे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, आॅगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबीराच्या माध्यमातून जवळपास ४० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी नियोजनातून काम करावे. त्यामुळे गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील अपंग व्यक्तीच्या स्वावलंबनासाठी २ कोटी रु पर्यंतची तरतूद केली असून अशा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियान-२०१६ राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार परळीकर यांनी, महासमाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी कामचुकारपणा करु नये असे सांगितले. यावेळी गजानन वाघ यांनी समाधान शिबिराच्या नियोजनाची व दिव्यांग स्वावलंबन अभियानाची माहिती दिली. महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारी आढावा बैठकीला सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, कृषी सहायक यांच्यासह यंत्रणांच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
योजनांचा लाभ देणे ही सर्वांची जबाबदारी
By admin | Updated: July 18, 2016 00:07 IST