सडक-अर्जुनी : मानवी जीवन हे अमूल्य ठेवा आहे. या ठेव्याला निरंतर जगविण्यासाठी स्वतः काळजी घेतली पाहिजे. माणसाची स्वच्छता नेहमी राहणार तर आरोग्य हे सुदृढ राहते. स्वच्छता असली की आरोग्य फुलाप्रमाणे हसत असते. म्हणून आरोग्यासोबतच स्वच्छता हा घटक मूलगामी आपल्या जीवनाला सुंदर बनवितो, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. मंगेश वानखेडे यांनी केले.
भारत सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्तवतीने १ ते १५ सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत ग्राम डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींच्या शासकीय निवासी शाळेत बुधवारी (दि.१५) आयोजित स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या दहिवले, स्वच्छता पंधरवडा उपक्रमाच्या मार्गदर्शक केटीएस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अंबर मडावी व अधिपरिचारिका भाग्यश्री कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना वानखेडे यांनी, अनेक लहान-लहान बाबींवर मात करून आपण अनेक रोगांना दूर करू शकतो. कोरोनाचे सर्व नियम पाळावे व निरोगी राहावे, असे सांगितले. संयोजन व संचालन सहायक अध्यापक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. आभार सहायक अध्यापक के. डी. अंबुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.