गोंदिया : बहुजन कल्याण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत एमपीएससी-युपीएससी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यासाठीच्या इच्छुक उमेदवारांची राज्यस्तरीय छाननी परीक्षा सोमवारी (दि.१३) राज्यातील विविध केंद्रांवर होणार असल्याचे गुरुवारी (दि.९) जाहीर केले. मात्र, तीन ३ दिवसांत विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे व मुंबईसारख्या ठिकाणाहून येऊन परीक्षा द्यायची आहे.
महाज्योतीकडून निर्धारित गटातील इच्छुक उमेदवारांना युपीएससी व नागरी गटातील परीक्षासांठी प्रशिक्षण देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महाज्योतीने चाचणी परीक्षा घेण्याचे ठरवून सोमवारची (दि.१३) तारीख जाहीर करुन विद्यार्थ्यांच्या अचडणीत अजून वाढ केली आहे. गुरुवारपासून (दि.९) महाज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मानसिक संताप होऊ लागला आहे. कोणतीही परीक्षा घेण्यासाठी कमीत कमी १ महिन्यांचा कालावधी द्यावा लागतो. त्यातच युपीएससी चाचणी परीक्षेविषयी १६ आँगस्ट रोजी महाज्योतीच्या संचालकाच्या बैठकीत चर्चा होऊन २८ आँगस्ट रोजी परिक्षा घेण्याचे नियोजित होते. तरीही परीक्षा घेण्यात आली नाही.
या प्रशिक्षणात फक्त ऑनलाइन वर्ग आहेत कुठलेही विद्यावेतन मिळणार नाही. २०२२ साठी नवीन बँच सुरू करणे योग्य नाही. कारण २०२२ ची पूर्व परीक्षा ५ जून २०२२ घोषित झाली आहे. त्यासाठी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी खाजगी प्रशिक्षण व अथवा त्यापद्धतीने अभ्यास सुरू केला आहे. त्याऐवजी २०२३ साठी नवीन बँच व २०२१ व २०२२ साठी मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण देणेच योग्य ठरेल.
-------------------------------
विद्यार्थ्यांची अडचण वाढली
आता अचानक तारखेची घोषणा करण्यात आली व त्यातही जवळपास महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी अभ्यासासाठी दिल्लीत वास्तव्यास आहेत आणि त्यांची नागरी सेवा पूर्व परीक्षा फक्त महिन्याभरावर आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना तातडीने येऊन परीक्षा देणे कितपत योग्य आहे. यात त्यांचे ३-४ दिवसांंच्या अभ्यासाचे नुकसान होणार नाही का ? असा प्रश्न्ही उपस्थित केला जात आहे. युपीएससी नागरी सेवा परीक्षा ऑक्टोबरमध्ये असल्याने ही परीक्षा १० ऑक्टोबरनंतरच घ्यायला पाहिजे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.