गोंदिया : 'या चिमण्यांनो परत फिरा रे.. घराकडे अपुल्या' या गीताचा अर्थ पक्ष्यांसाठी लावला तर आज शहरात राहण्यासाठी मनुष्याने त्यांना जागा सोडलीच कुठे? त्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील वाढत्या तापमानात माणसाप्रमाणे पक्ष्यांनाही दिवस काढणे कठीण झाले आहे. जीवसृष्टीचा समतोल बिघडू नये यासाठी पक्ष्यांना शहरात राहू द्यायचे असेल तर त्यांना पाणी व खाद्याची व्यवस्था करणे ही जबाबदारी शहरवासीयांची आहे. मनुष्याप्रमाणे पक्षी हे उष्ण रक्ताचे असतात. बाह्य तापमानात किती तरी बदल झाला तरी पक्ष्यांच्या शरीराच्या तापमानात फारसा बदल होत नाही. परंतु वाढलेल्या तापमानाचा निश्चित परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतो. सध्या शहराच्या तापमानात सतत वाढ होत आहे. यावर्षी अचानक तापमान वाढले आहे. एका विशिष्ट तापमानाची मनुष्याप्रमाणेच पक्ष्यांना उन्हाळ्यात सवय झालेली असते; परंतु हे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर गेल्याने त्याचा पक्ष्यांनाही त्रास होऊ लागतो. मग हे पक्षी पाण्यावरचे असो, माळरानावरचे असो अथवा झाडांवरचे असो. इतर सजीवांप्रमाणे पक्ष्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. काहींनी पक्ष्यांना पिण्यासाठी आपल्या घराच्या गच्चीवर प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवले आहे; पण उन्हामुळे ते पाणी गरम होत असल्याने जे शहरात शिल्लक आहे ते पक्षी त्यातील पाणी पीतच नाहीत. त्यांना मातीच्या भांड्यात पाणी ठेवले तरच ते पितात. मराठवाड्यात हरित क्षेत्र १0 टक्के नसल्याने आणि बहुतेक जलसाठे कोरडे झाल्याने पक्ष्यांवर संक्रांत आली आहे. जरी तापमान वाढले; परंतु मुबलक पिण्याचे पाणी, खाद्य आणि निवाऱ्यासाठी झाडांची भरपूर सावली असल्यास पक्ष्यांच्या जिवाला धोका होऊ शकत नाही. शहरात पक्ष्यांसाठी अन्न, पाणी, निवारा नसल्याने पक्ष्यांची अवस्था बिकट झाली आहे. पक्ष्यांनाही ऊन सहन न झाल्यामुळे व उन्हाळ्यात पाणी व पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे चक्कर येऊन पडणे, उष्माघात, यामुळे पक्षी मरत आहेत. मागील वर्षी 'मे' महिन्यात पक्ष्यांना उष्माघाताचा त्रास झाला होता. यंदा उन्हाचा पारा गेल्या वर्षीपेक्षा अधिक असल्याने पक्ष्यांना उष्माघाताचे त्रास होण्याचे प्रमाण वाढू शकते, असे जयपाल ठाकूर यांनी सांगितले. यावर्षी सुरूवातीला अधा-मधातून पावसाने हजेरी लावल्यामुळे काही दिवस साधारण वातावरण राहिले. परंतु मागील १० दिवसांपासून गोंदिया जिल्हा भाजून निघत आहे. याचा त्रास पक्ष्यांनाही होत आहे. (तालुका प्रतिनिधी)पक्ष्यांचा घरटे बांधण्याचा हंगाम पक्षीमित्र ठाकूर यांनी सांगितले की, ८० टक्के पक्षी 'मे' महिन्यात घरटे बांधण्यास सुरुवात करतात आणि एक महिन्यानंतर त्या घरट्यात ठेवलेल्या अंड्यातून पिलं बाहेर येतात. तोपर्यंत पावसाळा सुरू होत असतो. जेणेकरून गवत, पालापाचोळा व पाणी उपलब्ध होते. कीटक, अळ्या, फुले, फळे हे पक्ष्यांचे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होते आणि पिल्लांची वाढ जोमात होते. म्हणून उन्हाळ्यात पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्यामुळे आपल्याकडून काही मदतीची त्यांना गरज असते. ती गरज फूल व फळे देणारी झाडे लावल्याने पूर्ण होऊ शकते. मेसेजपुरताच पक्ष्यांचा कळवळा'पक्ष्यांना वाचवा' असा संदेश देणारे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. पक्ष्यांसाठी घराच्या गच्चीवर पाणी ठेवा, खाद्य ठेवा, असे मेसेज न चुकता एकमेकांना पाठविले जात आहेत; पण प्रत्यक्षात कृती फार कमी जण करताना दिसून येतात. मेसेज फॉरवर्ड करण्यापुरतेच पक्ष्यांचा कळवळा या नेटिजन्समध्ये पाहण्यास मिळत आहे. फुलांची झाडे लावापक्षी मनुष्यासाठी व निसर्गासाठी उपयुक्त असल्याने त्यांना वाचविणे आपले कर्तव्य आहे. यासाठी फार खर्च येत नाही. आपल्या घरासमोर वड, औदुंबर, साग, अशोकाची झाडे न लावता फुलांची झाडे व फळ देणारी झाडे लावल्यास पुन्हा पक्षी शहराकडे आकर्षित होतील.
'मे हीट'चा पक्ष्यांनाही ताप!
By admin | Updated: May 25, 2015 01:20 IST