पात्रतेची प्रतीक्षा
आमगाव : राज्यात उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत शासन मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना अनेक वर्षापासून अनुदानास पात्र ठरविण्यासाठी सार्थ पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. राज्यात भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियंत्रणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे ध्येय तंत्रशिक्षणातून पूर्ण करण्यात येत आहे. महाराष्टÑ राज्य तंत्रशिक्षणातून शासनाने पदविका, पदवी व पदव्युत्तरातील अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. यासाठी शासनाने शासकीय व खासगी संस्थांनाना शिक्षणासाठी लागणार्या सोईची उपलब्धता पुरवून घेतली. राज्यात २१४५ विद्यालयातून कुशलतेने तंत्रज्ञानातील तंत्रज्ञ घडविण्याचे कार्य विद्यालयातून करण्यात येत आहे. या महाविद्यालयांमध्ये तंत्रशिक्षण विभागाने ठरविलेल्या मापदंडानुसार खासगी व शासकीय महाविद्यालयामध्ये सर्वच पदांची पूर्तता करण्यात आली. यात शासकीय महाविद्यालये अनुदानित असल्याने यात कर्मचारीवृंद हा स्वत:ला सुरक्षित समजत आहे. परंतु खासगी संस्थांची अवस्था फार बिकट आहे. या शिक्षण संस्थांमधील कर्मचार्यांच्या दृष्टीने शासनाने व तंत्रशिक्षण विभागाने कधीही पुढाकार घेवून त्यांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कायम अनुदान श्क्षिण संस्थानमधील कर्मचार्यांचे भवितव्य उजाळले नाही. संस्था चालकांकडून मिळणार्या मानधनावर त्यांचे उदरनिर्वाह सुरू आहे. या संस्थामधील कर्मचार्यांची वेतन रोजंदारी मंजुरीच्यापेक्षाही कमी आहे. सलग दैनंदिन शैक्षणिक कार्य करुन सुद्धा कर्मचार्यांना मिळेल त्या वेतनावर कार्य करावे लागत आहे. तंत्रशिक्षण संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी शासनाने कायम अनुदानित संस्थांना अनुदान देईल या आशेवर कर्मचार्यांनी शैक्षणिक कार्यात आपले आयुष्य झिजविले, परंतु कमी मिळणार्या वेतनावर कुटुंब मात्र उघड्यावर पडले आहे. कर्मचारी एकनिष्ठपणे कार्यकुशलतेने आपले कर्तव्य बजावून शासनाच्या धोरणाला सार्थक ठरवित आहे. आता हेच कर्मचारी शासनाकडे आशेने बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)