चार कोटींची थकबाकी : पाच वर्षापासून दोन हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा गोंदिया : भारत सरकारतर्फे मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात सन २०१५-१६ या वर्षातील ५ हजार ९९८ विद्यार्थ्यांना तर सन २०११-१२ ते २०१४-१५ या पाच वर्षातील २ हजार विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आलेला नाही. इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती व विमुक्त जाती-भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. दोन लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना फ्रिशिप तर एक लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना जीओआयचा लाभ देण्यात येतो. गोंदिया जिल्ह्यातील फ्रिशिप योजनेअंतर्गत ६ हजार ८९४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची होती. त्यापैकी फक्त २०४ लोकांना तर जीओआयच्या १२८६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. परंतु ८ हजाराच्या घरात असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. महाविद्यालयीनस्तरावर फ्रिशिपचे १३३ तर जीओआयचे २१५३ अर्ज प्रलंबित आहेत. जिल्हास्तरावर म्हणजे विशेष समाज कल्याण विभागाकडे फ्रिशीपचे १९८ तर जीओआयचे २९२९ अर्ज प्रलंबित आहेत. महाविद्यालयीन स्तरावर एकूण २ हजार २८६ तर जिल्हास्तरावर ३ हजार १२७ अर्ज प्रलंबित आहेत. या ५ हजार ४१३ विद्यार्थ्यांची ३ कोटी २ लाख ९३ हजार १४१ रूपये शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत. तर सन २०११-१२ ते २०१४-१५ या दरम्यानच्या २ हजार विद्यार्थ्यांची एक कोटीच्या घरात असलेली शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. (तालुका प्रतिनिधी)
गोंदियातील आठ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित
By admin | Updated: December 25, 2016 02:12 IST