गोंदिया : शहरालगतच्या फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, यासंबंधीचा प्रस्ताव २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही ग्रामपंचायतींकडून सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, यासंदर्भात मार्गदर्शन व सूचनांच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी सतत टाळाटाळ केली जात आहे. या दोन ग्रामपंचायतींचे नगर पंचायतीत करावे, या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश चतूर व नागरिक बुधवारी (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
नगर विकास मंत्रालयाने फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायती नगर पंचायतीमध्ये परावर्तीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केल्यानंतरही दोन वर्षांपासून तो प्रस्ताव धूळखात पडला आहे. यामुळे फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत तर अन्नत्याग सत्याग्रह करू, असा इशाराही संतप्त नागरिकांकडून देण्यात आला होता. शहरालगतच्या फुलचूर व फुलचूरटोला या दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. तसेच जिल्हा मुख्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ही महत्त्वाची कार्यालये या गाव क्षेत्रात मोडतात. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींच्यावतीने २०१९मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आले. त्या प्रस्तावांची छाननी करून २६ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणना, अकृषक व सर्वेक्षण पूर्ण केले व तो प्रस्ताव शासनाला सादर करणार एवढ्यात मार्च २०२०पासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले.
परिणामी हा प्रस्ताव शासन दरबारी पोहोचू शकला नाही. दरम्यान, शासनाने २६ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा प्रशासनाला प्रस्ताव पाठविल्याबाबत सूचित केले होते. मात्र, त्यानंतरही प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. याबाबत ग्रामवासीयांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन १६ जुलै २०२१ रोजी पुन्हा निवेदन सादर केले. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारुप पत्र तयार करण्याला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने त्वरित फुलचूर व फुलचूरटोलाला नगर पंचायतीचा दर्जा द्यावा व जिल्हा प्रशासनाने तो अहवाल शासनाला त्वरित पाठवावा, या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला माजी आमदार केशव मानकर, हेमंत पटले, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे, संजय कुळकर्णी, धनलाल ठाकरे यांनी भेट दिली.