गोंदिया : आॅल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे असंघटित कामगारांचा मोर्चा राजलक्ष्मी चौकातून काढून उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात पंचायत, अंगणवाडी सेविका-सहायिका, घरेलू कामगार, आशा सेविका, बिडी कामगार, शालेय पोषण आहार, शेतमजूर मोठ्या संख्येत उपस्थित होते. सदर मोर्च्याचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव शिवकुमार गणविर, जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा सहसचिव करुणा गणविर व कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी केले.आॅगस्ट २०१३ पासून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन व प्रवास भत्ता देणे, शालेय पोषण आहार कामगारांना वेळेवर मानधन तसेच कामावरुन कमी केलेल्या स्वयंपाकीय महिलांना शासन निर्णयाप्रमाणे पूर्ववत कामावार घेणे, अंगकालीन स्त्री परिचारांना ६० वर्षानंतर जि.प. आरोग्य विभागातील जबरान कामावरुन कमी करणे बंद करणे, आशा सेविकांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदल वेळेवर मिळणे, बिडी कामगारांच्या किमान वेतन कायद्यांची अमलबजावणी करणे, लूज (बिजनिस) बिडी मालकांवर कारवाई करणे, घर कामगारांची नोंदणीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयात चाललेली दलाली बंद करणे, मानधन १० हजार रुपये त्वरित वाटप करणे, रोजगार हमी मजूरांची थकीत मजुरी त्वरित देणे व १६८ रुपये मजुरी देणे इत्यादी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.मोर्चे-धरणे आंदोलनात मिलिंद गणवीर, शेखर कनौजिया, वासुदेव ढोके, राजेंद्र हटेले, आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, जशोदा राऊत, मोहपत मानकर, सत्यपाल उके, उषा बारमाटे, अनिल तुमसरे, चरणदास भावे, टेकचंद चौधरी इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
आयटकचा शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा
By admin | Updated: September 6, 2014 02:06 IST