रेल्वेला निधी अप्राप्त : अंडरग्राऊंड केबल हटविण्याचे काम रेल्वेने केले बंदगोंदिया : शहरात आणखी एका उड्डाण पुलाचे काम केले जात आहे. परंतु या उड्डाण पुलाचे काम राज्य शासनाच्या बांधकाम विभागाजवळ पर्याप्त निधी नसल्यामुळे ठप्प पडले आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे काम बंद आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेला निधी देणे गरजेचे होते. परंतु निधी न मिळाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने केबल हटविण्याचे आपले काम थांबविले आहे.शहराच्या हड्डीटोलीजवळ हा उड्डाण पूल बनविण्यात येत आहे. हा उड्डाण पूल तयार करण्याचा उद्देश म्हणजे या मार्गावर तिरोडा-बालाघाटच्या दिशांनी येणाऱ्या अवजड वाहनांना शहराच्या बाहेरूनच आमगाव व कोहमारा मार्गावर रवाना करणे व त्यामुळे अवजड वाहनांचा प्रवेश शहरात होणार नाही, असे आहे. त्यामुळे शहरात होणाऱ्या अपघातांच्या संख्येत कमी येईल व योग्य वेळी अवजड वाहने आपल्या ठिकाणी पोहोचू शकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या बांधकामासाठी राज्य शासनाने ३५ कोटी रूपये मंजूर केले आहेत. प्रत्यक्षात ३० कोटी ५६ लाख ३० हजार ९५९ रूपयांचा करारनामा करण्यात आला आहे. करारनाम्यानुसार २४ महिन्यांत म्हणजे १६ मे २०१६ पर्यंत सदर बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. बालाघाटच्या दिशेकडे ४४६ मीटर व कोहमाराच्या दिशेकडे ५४६ मीटर लांब मार्ग त्याअंतर्गत बनविण्यात येणार आहे. यासाठी आर्थिक वर्ष २०१४-१५ दरम्यान १७.१५ कोटी रूपये व आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये ९.७४ कोटी रूपयांचे काम झाले आहे. आतापर्यंत २६.८९ कोटी रूपये खर्च झाले आहेत. सन २०१५-१६ मध्ये ३.८८ कोटी रूपये खर्चाची तरतूद शासनाने केली आहे. मात्र २१ कोटी रूपयांची मागणी शासनाकडून करण्यात आली आहे. ज्या गतीने सदर कामाची सुरूवात झाली होती, त्यावरून लवकरच वेळेच्या आत काम पूर्ण होईल, असे अंदाज बांधले जात होते. परंतु शासनाने बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून काम थंडबस्त्यात असून आतापर्यंत काम सुरू होण्याची चिन्हेसुद्धा दिसून येत नाही. (प्रतिनिधी)
उड्डाण पुलाचे काम थंडबस्त्यात
By admin | Updated: September 16, 2015 02:28 IST