कपिल केकत गोंदियाशाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे अशा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (ंमुंबई) सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिक्षा विभागाकडून जिल्ह्यातील ९१ हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे ३ कोटी ३० लाख रूपयांची मागणी शिक्षण परिषदेकडे करण्यात आली आहे. मात्र निधीची पूर्तता न झाल्याने यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणे शक्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान राबविले जात आहे. त्यानुसार विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी धडपड करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहेत. गावखेडे व दुर्गम भागातही मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत टाकले जात आहे. तर मुले व त्यांच्या पालकांना शाळेप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तक, मध्यान्ह भोजन व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत. त्याचा फायदाही मिळत आहे यात शंका नाही. मात्र कोठेतरी योजनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात शासनच आडकाठी बनत असल्याचेही तेवढेच सत्य पुढे येत आहे. त्याचे कारण असे की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सूचनेनुसार शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करायचे आहेत. ही बाब लक्षात घेत येथील सर्व शिक्षा अभियानाकडून डिसेंबर महिन्यातच तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात विभागाकडून ९१ हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे तीन कोटी ३० लाख रूपयांची मागणी विद्यार्थ्यांच्या गणवेशसाठी करण्यात आली आहे. या प्रस्तावाला एप्रिलच्या सुरूवातीला मंजूरी मिळणे अपेक्षीत असते. यंदा मात्र मागितलेल्या निधीला मंजूरी मिळालेली नाही. विभागाकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना प्रकल्प मान्यता मंडळ (दिल्ली) कडून मंजूरी दिली जात असून त्यानंतर शिक्षण परिषदेकडे निधी दिला जातो. यंदा मात्र प्रकल्प मान्यता मंडळाकडूनच शिक्षण परिषदेला निधी देण्यात आलेला नाही. अशात शिक्षण परिषदेला निधी कधी मिळणार व त्यांच्याकडून जिल्ह्याला निधी कधी मिळणार ही एक लांब प्रक्रिया आहे. येत्या २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजतो. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत तरी एवढ्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे अशक्य असल्याचे विभागातील अधिकारी व कर्मचारी खुद्द म्हणत आहेत. विशेष म्हणजे येथील सर्व शिक्षा विभागाकडे २२ मे रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून पहिल्याच दिवशी गणवेश वाटप करण्याच्या मार्गदर्शक सुचनांचे पत्र धडकले आहे. मात्र निधीच नसल्याने या सुचनांचे पालन करणे विभागाला शक्य नाही. एकंदर यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार नाहीच. खुल्या वर्गातील विद्यार्थी वंचित एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार त्या मुलासाठी कोणत्या जाती, जमाती प्रवर्गाची अट शासनाने ठरवून दिलेली नाही. मूल म्हणजे मूल या तत्त्वानुसार प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार शासनाने बहाल केला आहे. मात्र गणवेश वाटपात शासनाकडून पक्षपात केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, मिळालेल्या माहितीनुसार, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश दिले जाणार नाही अशी अट आहे. तर उर्वरित अन्य प्रवर्गातील विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरतात. येथे मात्र खुल्या वर्गातील प्रत्येकच कुटुंबाची आर्थिक स्थिती बळकट असती तर त्यांनी आपल्या अपत्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत कशाला टाकले असते असा प्रश्न उपस्थित होतो. तर विद्यार्थ्याला विद्यार्थी समजून त्याची जात न बघता शासनाने योजना राबविणे गरजेचे आहे. गणवेश वाटपाची प्रक्रिया किचकट शिक्षण परिषदेकडून जिल्हास्तरावर सर्व शिक्षा अभियानाला निधी मिळाल्यानंतर तालुकास्तरावर निधी वितरीत केला जातो. तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी त्यांच्या तालुक्यातील शाळांना विद्यार्थी संख्येप्रमाणे निधी वितरीत करतात. तर शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीकडून विद्यार्थ्यांसाठी गणवेश तयार केले जातात. तेथूनच विद्यार्थ्यांना वाटप केले जातात. अशात आतापर्यंत प्रकल्प मान्यता मंडळाकडून मंजुरी न मिळाल्याने राज्य शासनालाच निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर कधी निधी मिळणार व कधी अन्य प्रक्रिया होणार हे सांगणे कठीण आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दोन जोड गणवेश गणवेश वाटपांतर्गत राज्य शासनाकडून अनुसुचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना एक जोड गणवेश दिला जातो. तर सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुसुचित जाती, जमातीतील विद्यार्थ्यांना एक जोड गणवेश दिला जातो. शिवाय बीपीएल व सर्व मुलींना दोन जोड गणवेश दिले जातात. येत्या २६ जूनपासून शाळा सुरू होणार असून एवढ्या कालावधीत सुमारे ९१ हजार विद्यार्थ्यांचे गणवेश तयार होणे ही कठीण बाब आहे. यामुळेच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अशक्य दिसून येत आहे.
पहिल्या दिवशी गणवेश नाहीच
By admin | Updated: May 25, 2015 01:09 IST