गोरेगाव : वृक्षारोपण केल्यानंतर त्याच्या संगोपनाची जबाबदारी फक्त ग्रामपंचायत प्रशासनाची आहे, असे समजून आपण नामानिराळे राहणे हे चुकीचे आहे. त्याच्या संगोपनाची जबाबदारी ही सर्वांची असल्याने गावकऱ्यांनी त्यास सहकार्य करून वृक्षसंगोपन करावे, असे आवाहन सटवावासीयांनी केले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सटवा येथील ग्रामपंचायत परिसरात वड या ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे रोपण सरपंच विनोद पारधी यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक कार्यकर्ते भागचंद्र रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीसपाटील टीकाराम रहांगडाले, उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, माजी पोलीसपाटील केशोराव ठाकूर, भोजराज कटरे, दिलीप रहांगडाले, नितीन कटरे, सुनील ठाकूर, रोजगार सेवक घनश्याम बोडणे, चंद्रहास पारधी उपस्थित होते. विशेष म्हणजे रोपण केलेल्या झाडांवर, 'तुम्ही मला ३ वर्षे सांभाळा, मी तुम्हाला ३०० वर्षे सांभाळतो' असा संदेश लावून वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करण्यात आले.