केशोरी : गावातील पथदिव्यांची जोडणी खंडित केल्याने मागील २ महिन्यांपासून पथदिवे बंद आहेत. जिल्हा परिषदेने आपली जबाबदारी टाळून, पथदिव्यांचे वीज बिल संबंधीत ग्रामपंचायतीने भरावे, म्हणून फतवा काढला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनेक गावांसह येथील पथदिवे सणासुदीच्या काळातही बंदच आहेत. परिणामी गावकऱ्यांना रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा पोळा नुकताच गेला. लगेच गावा-गावात गणपती उत्सवाची सुरुवात झाली आहे. परंतु अजूनही येथील पथदिवे बंदच आहेत. यावर ग्रामपंचायत सरपंच संघटना काय निर्णय घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी गावातील पथदिव्यांचे वीज बिल जिल्हा परिषद भरत होती. परंतु अलीकडे वीज वितरण कंपनीने सार्वजनिक पथदिव्यांच्या बिलाची नोटीस ग्रामपंचायतीला बजावून बिलाची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत चांगलीच अडचणीत आली आहे.
वीज वितरण कंपनीने पथदिव्यांचे थकीत बिल भरण्याची नोटीस देऊन २ महिन्यांपूर्वी वीज जोडणी कापली. १५ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधीतून पथदिव्यांचे बिल ग्रामपंचायतीने भरावे, असे शासनाने आदेश काढले आहेत. परंतु हा निधी ग्रामपंचायतीने इतर विकास कामात खर्ची घालण्याचे नियोजन केल्यामुळे पथदिव्यांचे बिल कसे भरावे? अशा विवंचनेत ग्रामपंचायत सापडली आहे. पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषदेने भरावे, या मागणीला घेऊन तालुका सरपंच संघटनेने पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे कैफियत मांडली. परंतु अजूनही पथदिव्यांच्या बिलाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळातही केशोरीवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
-------------------------
कोट
कोरोना संक्रमण काळात ग्रामपंचायती अधिकच अडचणीत आल्या आहेत. करवसुलीचे प्रमाण सुद्धा घटले आहे. नियोजित गाव विकासाच्या योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पथदिव्यांचे बिल भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा.
- नंदू पाटील गहाणे
सरपंच, केशोरी