गोंदिया : जिल्ह्याला चार मोठी धरणे वरदान स्वरूपात लाभली आहेत. त्यांच्या भरवश्यावरच जिल्ह्यात वर्षभर पाणी पुरवठा व शेतीचे सिंचन केले जाते. यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणाता पावसाअभावी जिल्ह्यातील ही धरणे अद्याप तहानलेलीच आहेत. पावसाळा मधोमध असतानाही ही धरणे अर्धीच भरल्याची नोंद आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर यावर्षी रबी हंगामात पाण्याला पुरेशा पाण्यासाठी वंचित राहावे लागणार आहे. जिल्ह्यात चार मोठ्या धरणांसह, १० मध्यम प्रकल्प, २० लघु प्रकल्प व ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्याला या पाणी पुरवठा व शेतीसाठी सर्वांचाच आधार घ्यावा लागतो. यात प्रमुख सहभाग अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह, देवरी तालुक्यातील सिरपूर, आमगाव तालुक्यातील पुजारीलोटा व कालीसराड यांचा आहे. जिल्ह्याला वर्षभर पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी या चार धरणांत पुरेपूर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यंदा पावसाळा अर्धा लोटून गेला असून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नसल्याने ही धरणे अर्धीच भरलेली आहेत. आकडेवारीनुसार बघितल्यास, इटियाडोह धरणात आज ४७.६५ टक्के पाणीसाठा असून मागील याच धरणात ६५.२३ टक्के पाणीसाठा होता. सिरपूर धरणात ५७.२९ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ७०.४४ टक्के पाणीसाठी होता. पूजारीटोला धरणात ५६.०२ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी ५३.५८ टक्के तर कालीसराड धरणात ५१.४२ टक्के पाणीसाठी मागील वर्षी ५७.५१ टक्के पाणीसाठी होता. वरील आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठी कमीच आहे. मागील वर्षी धरणांमध्ये असलेल्या भरपूर पाणीसाठ्यामुळे याच प्रकल्पांमधून जिल्हाला पाणी पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे रबीच्या हंगामातही पाटबंधारे विभागाने शेतीला सिंचनासाठी पुरेपूर पाणी दिले होते. शिवाय मध्यम प्रकल्पांची स्थिती बघितल्यास, बोदलकसा मध्यम प्रकल्पात ८०.१२ टक्के, चोरखमारा ५१.०३ टक्के, चुलबंद ८६.८९ टक्के, खैरबंधा ४४.३७ टक्के, मानागड ८१.९८ टक्के, रेंगेपार ७४.४५ टक्के, संग्रामपूर ६६.८६ टक्के पाणीसाठी असून उमरझरी, कटंगी व कलपाथरी मध्यम प्रकल्पांत पुरेपुर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारली असून यातील मोजकेच पाण्याने तुडूंब भरले आहेत. तर उर्वरीत अद्याप अर्ध्यावरच अडकले असून त्यांची तहान भागलेली नसल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)
पावसाअभावी धरणे तहानलेलीच
By admin | Updated: July 31, 2014 00:06 IST