आमगाव : निवडणूक आयोगाने राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे. या विरोधात बुधवारी (दि.१५) तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्रात ओबीसी समाजावर भविष्यात होणाऱ्या अन्यायाची दखल न घेता महाराष्ट्रातील महविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाशी विश्वासघात करून आरक्षण संपुष्टात आणले आहे. येत्या काळात होणाऱ्या नगर पंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. परंतु, यासंबंधी ओबीसी समाजाच्या भविष्याचा कोणताही विचार न करता महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाच्या आरक्षणाची बाजू वकिलामार्फत प्रभावीपणे मांडली नाही. त्यामुळे ओबीसी समाजावर नको ते अन्याय झाले आहेत. म्हणूनच, ओबीसी समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी ओबीसी समाजाला आरक्षण दिल्याशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
निवेदन देताना माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी आमदार संजय पुराम, मंडळ अध्यक्ष काशीराम हुकरे, ॲड. येशूलाल उपराडे, नरेंद्र बाजपेई, राकेश शेंडे, राजू पटले, यशवंत मानकर, हरिहर मानकर, निमेश दमाहे, सुषमा भुजाडे, सुनंदा उके, संगीता वाटकर, हुकूम बोहरे, बालू भुजाडे, बाबा पुंड, अशोक पटले, मनोज सोमवंशी, आकाश जैतवार, रमेश चुटे, अनिरुद्ध शेंडे, रोशन फरकुंडे, हनवांत वटी, नोहर चौधरी, लक्ष्मण चुटे, उत्तम शिवणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.