गोंदिया : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना युरिया खतासाठी वणवण भटकावे लागत असून, चढ्या दराने खरेदी करावे लागत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे; मात्र मागील काही दिवसांपासून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी मिळेल ते दाम देऊन युरिया खत खरेदी करण्यासाठी भटकत आहे. ३०० रुपयाला मिळणारी बॅग सध्या ५०० रुपये देऊनही शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. गोरेगाव तालुक्यातील अनेक कृषी केंद्र संचालक ५०० रुपये घेऊन खत विक्री करीत आहेत; मात्र प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून कृषी विभागाला धारेवर धरत शेतकऱ्यांना योग्य दरात कसे युरिया खत उपलब्ध करून देण्यात येईल यासंदर्भात नियोजन करावे, अशी मागणी कटरे यांनी केली आहे.