गोंदिया : महाराष्ट्र प्राधीकरणच्या लेटलतीफ कारभाराने शहरवासी अगोदरच त्रस्त आहेत. अशात मजीप्राने आपल्या लेटलतिफीचे आणखी एक कृत्य पुढे केले आहे. दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मजीप्राने एक दिवस निघून गेल्यावर वृत्तपत्रांना दिली. यातून मजीप्राला उशीरा जाग आल्याचे दिसून येते. मजीप्राच्या या कृत्यामुळे मात्र शहरातील नळ कनेक्शन धारकांची तारांबळ उडाली. शहरातील नगर परिषद कार्यालयाजवळील पाणी टंकीच्या वॉल्वची दुरूस्ती करावयाची असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणने दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे ठरविले. यासाठी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तर ६ सप्टेंबर रोजी सकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मजीप्राने ४ सप्टेंबर किंवा त्यापूर्वी शहरातील नळ कनेक्शन धारकांना सुचीत करणे गरजेचे होते. मात्र आपल्या लेटलतीफ कारभाराचा परिचय देत मजीप्राने ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी पत्रकं दिले. पत्रकातील सुचना बातमी रूपात ६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार याबाबत मजीप्राला माहिती नसावी अशी कल्पना यातून येते. मजीप्राच्या या कारभारामुळे मात्र शहरवासीयांची चांगलीच तांराबळ ुउडणार यात काही शंका नाही. तर या कृत्यातून मात्र मजीप्राला उशीरा जाग आल्याचे दिसून आले. त्यातही विशेष म्हणजे ज्या विभागाच्या नावातच महाराष्ट्राचा उल्लेख आहे. त्या विभागाचे पत्रक मात्र अर्धे हिंदी व अर्धे मराठी भाषेत तयार करण्यात आले होते. यातून या विभागातील अधिकारी आपण कोणत्या राज्यात काम करीत आहोत याचाही भान ठेवत नसल्याचे बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
दिवस निघून गेल्यावर आली मजीप्राला जाग
By admin | Updated: September 6, 2014 02:05 IST