गोंदिया : गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत अवघा ७२ टक्केच पाऊस झाल्यामुळे ििजल्ह्यातील जलाशयांचा तळ उघडा पडला आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत यंदा नाममात्र पाणीसाठी उपलब्ध आहे. चारपैकी दोन मोठे प्रकल्प आटले असून अन्य प्रकल्पांतही पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे पावसाळा लांबल्यास भिषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलवांचा जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील यंदाची पाण्याची स्थिती बिकट झाली आहे. जिल्ह्याला पाण्याची पुर्तता करण्यासाठी चार मोठे प्रकल्प, १० मध्यम प्रकल्प तर २० लघु प्रकल्प आहेत. याखेरीज ३८ जुने मालगुजारी तलाव आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलस्त्रोत असूनही आजघडीला हे सर्व प्रकल्प आॅक्सीजनवर आहेत. या प्रकल्पांतील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून फक्त नाममात्र पाण्याची नोंद संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील चार मोठ्या प्रकल्पांवर नजर टाकल्यास इटियाडोह प्रकल्पात फक्त २९.६८ दलघमी (९.३२ टक्के) तर सिरपूर प्रकल्पात ८.९५ दलघमी (४.६५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. येथे आश्चर्याची बाब म्हणजे मागील वर्षी याच दिवशी इटियाडोह प्रकल्पात ७३.४५ दलघमी (२३.०३ टक्के) तर सिरपूर प्रकल्पात ४५.७६ दलघमी (२३.७६ टक्के) पाणीसाठी होता. शिवाय पूजारीटोला व कालीसराड हे मोठे धरण कोरडे पडले आहेत. त्यात उपयुक्त जलसाठा उपलब्ध नाही. यावरून मोठ्या प्रकल्पांची स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत हलाखीची असल्याचे स्पष्ट दिसून येते. मध्यम प्रकल्पांचीही हीच स्थिती आहे. जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्पांपैकी उमरझरी प्रकल्पात १२.०८ टक्के पाण्याची नोेंद असून उर्वरीत सर्व प्रकल्पांत नाममात्र पाणीसाठा आहे. तसेच २० लघु प्रकल्पांचीही ही स्थिती आहे. तिरोडा तालुक्यातील भदभद्या प्रकल्पात १४.०१ टक्के, सडक अर्जुनी तालुक्यातील मोगरा प्रकल्पात २६.३८ टक्के, सालेकसा तालुक्यातील पिपरीया प्रकल्पात १६.५४ टक्के व देवरी तालुक्यातील रेहाडी प्रकल्पात १७.४३ टक्के पाण्याची नोंद असून उर्वरित प्रकल्प १० टक्केच्या आत आहेत. (शहर प्रतिनिधी)मालगुजारी तलावांचीही स्थिती गंभीर पाटबंधारे विभागाकडे ३८ माजी मालगुजारी (मामा) तलावांची नोंद आहे. यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोकना तलावात १२.८६ टक्के, लेंडेझरी तलावात ११.३६ टक्के, पुतळी तलावात ४७.७८, सौंदड तलावात २५.५१ टक्के, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकूडा तलावात ९२.४३ टक्के, तिरोडा तालुक्यातील नांदलपार तलावात ११.८१ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. तर उर्वरीत तलावांतही अन्य प्रकल्पांप्रमाणेच नाममात्र पाणीसाठी असून येत्या काही दिवसांत हे तलाव आटतील अशी परिस्थिती आहे.... अन्यथा पाण्यासाठी होणार मारामारपावसाळा सुरू होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी आहे. प्रकल्पांची ही स्थिती पाहता वेळीच पाऊस पडणे गरजेचे आहे. पावसाने हुलकावणी दिली तर मात्र येत्या काळात या प्रकल्पांतील पाणी आटणार यात शंका नाही. असे झाल्यास पाण्यासाठी जिल्ह्यात मोठी मारामार सुरू होऊ शकते. ही स्थिती निर्माण झाली असल्यामुळे आता पाण्याचे महत्व ओळखून त्याचा अपव्यय टाळून जास्तीत जास्त पाणी साठविण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रकल्पांत ठणठणाट
By admin | Updated: May 23, 2015 01:39 IST