मैदानी खेळाचा अभाव : अतिक्रमणाच्या सपाट्यामुळे पटांगणेही लुप्तरावणवाडी : एकेकाळी हिवाळ्याची चाहूल लागताच पारंपरिक मैदानी खेळ रंगायचे. परंतु २१ व्या शतकातील संगणक युगामुळे ग्रामीण भागातील मुलांचे पारंपरिक मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यापैकी पुरातन खेळांची माहिती आजच्या बच्चे कंपनीला नसल्याचे चित्र आहे. परिणामी मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे.ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हा परिषद शाळालगत मोठमोठे मैदानी खेळ खेळण्यासाठी पटांगणे असायचे. मात्र या पटांगणावर चहूबाजुंनी अतिक्रमण झाल्यामुळे ही पटांगणे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. ही पटांगणे मोकळे करुन देण्याकरिता कुणीही पुढाकार घेत नसल्यामुळे मैदानी खेळांचे अस्तित्व सद्यस्थितीत धोक्यात आले आहे. पटांगणाअभावी डिजिटल युगामुळे संगणक, मोबाईल गेम, व्हिडीओ गेम आदी खेळाकडे मुलांचा कल वाढला आहे. यासाठी शाळा परिसरात अपुरी मैदानेही कारणीभूत ठरत आहेत.गावात पटांगणाअभावी दिवसभर मुले मोबाईलवरील गेम, टीव्हीवरील कार्टुन पाहण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराच्या दुष्परिणामामुळे बालपणापासूनच अनेक प्रकारच्या व्याधींना समोर जावे लागत असून सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होत आहे. याशिवाय शारीरिक, मानसिक आरोग्यावरही मोठ्याने परिणाम जाणवत आहेत. त्याबाबदचे आकडेही प्रशासनासमक्ष नोंद असूनसुद्धा बघ्याची भूमिका निभावण्यात येत आहे. अनेक शाळा परिसरातील पटांगणे अतिक्रमणाचा सपाट्यामुळे गिळकृंत झालेली आहेत. मात्र अशा प्रकारावर कुठेही कारवाई प्रशासनाने केली असल्याची माहिती ऐकीवातसुद्धा नाही. त्यात शाळा प्रशासनाचेही पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. शाळा परिसरातील पटांगणे लुप्त होण्याच्या मार्गावर असून मैदानी खेळांपासून मुलांसोबतच युवा वर्गासही खेळांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने क्रीडांगणावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्याची गरज आहे.मैदानी खेळाअभावी बालपणापासूनच पालकांना पाल्याच्या आरोग्यविषयक अतिरिक्त आर्थिक खर्चही करणे भाग पडत असून शाळा परिसरातील पटांगणे मोकळे कधी होणार, याची आतुरतेने वाट बघत आहेत. (वार्ताहर)
मुलांचे आरोग्य धोक्यात
By admin | Updated: November 11, 2016 01:37 IST