सडक-अर्जुनी : येथील वाॅर्ड क्रमांक-४ मधील कुंडलिक भोयर यांच्या घराजवळ असलेल्या बोअरवेलमधून काळसर गढूळ पाणी येत आहे. बोअरवेलला लागून असलेल्या नालीतील पाण्याची निकासी होत नसल्यामुळे बोअरवेलला गढूळ पाणी येत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्जुनी - शेंडा रस्ता व नाली बांधकाम मागील दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू असून, हे काम नागपूर येथील कंपनी करीत आहे. नालीचे काम अर्धवट झाले असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने नालीतील पाण्याची निकासी होत नसल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. नालीत साचलेले पाणी गढूळ व काळसर दिसत असून, नालीच्या जवळच बोअरवेल असल्याने नालीतील घाण पाण्याचा निचरा बोअरवेलमध्ये होत आहे. यामुळे बोअरवेलला तेच घाण पाणी येत आहे. नालीत साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले असून, डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
या वॉर्डात हे एकच बोअरवेल असून, पशू संवर्धन कार्यालय, तहसील कार्यालय व अन्य कार्यालयात ये-जा करणारे नागरिक कित्येकदा येथून पाणी प्राशन करतात. शिवाय, ज्यांच्या घरी बोअरवेल नाही, असे कुटुंबीयही येथूनच पाणी नेतात. मात्र, असे गढूळ पाणी प्यायल्याने त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न उद्भवतो. नगर पंचायतीने याकड़े लक्ष देऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.