तिरोडा : सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शासनातर्फे वर्ग १ ते ८च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. मात्र, यावर्षी शासनातर्फे पाठ्यपुस्तकांच्या वितरणाचे कंत्राट मुंबई येथील कार्गो कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीतर्फे अजूनपर्यंत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेण्यास अडचण येत आहे. पाठ्यपुस्तके तयार असली तरी कार्गो कंपनीने व्यवस्था न केल्याने ही पुस्तके धूळखात पडली आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, हे धेय्य असले तरी काही पालकांची आर्थिक परिस्थिती पुस्तके विकत घेण्याची नाही. पुस्तकाविना विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, नगरपरिषद, खासगी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येत आहेत. दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरणाचे काम गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होत होते. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. मात्र, यावर्षी शासन स्तरावरून झालेल्या निर्णयानुसार पाठ्यपुस्तके वितरणाचे काम मुंबई येथील शिरोष कार्गो या कंपनीला देण्यात आले. या कंपनीतर्फे शालेय स्तरावर पुस्तके वितरणाचे काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तके धूळखात पडली असून, विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी मधुकर पारधी यांना विचारणा केली. त्यांनी आम्ही वारंवार कार्गो कंपनीशी संपर्क साधत असून, त्यांच्याकडून काहीच उत्तर दिले जात नाही. त्यामुळे पुस्तके कधी वाटप होतील याबद्दल काहीही सांगत नाहीत. अजूनपर्यंत तरी पुस्तकांचे वाटप झाले नसल्याचे पारधी यांनी सांगितले.