आमगाव : मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली आहे. धानाची वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढली आहे. मात्र, तालुक्यात युरिया खत मिळत नसून काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून अतिरिक्त दराने विक्री करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट केली जात असून, याकडे कृषी विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
खरीप हंगामातील धान पिकाला सध्या युरिया खताची गरज आहे. परंतु, युरिया खताचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न केल्याने टंचाई निर्माण झाली आहे, तर काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. स्टॉक रजिस्टरमध्ये युरिया खताची विक्री झाल्याचे दाखवीत आहे. गरजू शेतकरी २६६ रुपयांच्या युरियाची ४०० रुपयांना विकत घेत आहेत. युरिया कंपोस्ट बॅगचे कृषी केंद्रचालक बिल देत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. तुम्हाला युरिया खताची बॅग घेऊन जायचे असेल तर घ्या, तुम्हाला बिल मिळणार नाही असे बजावले जात आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात युरियाचा अधिक प्रमाणात काळाबाजार केला जात आहे. तालुक्यात युरियाचा सर्रासपणे काळाबाजार सुरू असताना कारवाई करण्याकडे कृषी विभागाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी याची दखल घेऊन युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.