गोंदिया : शहराजवळील फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून त्यांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव शासनाला तातडीने पाठविण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश चतुर तसेच फुलचूर व फुलचूरटोलावासीयांनी बुधवारपासून (दि. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असून जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केशव मानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचे समर्थन जाहीर केले व पत्र दिले.
फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन ग्रामपंचायतींचे समायोजन करून नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. याबाबत २१ डिसेंबर २०१९ रोजी दोन्ही ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव सादर करून जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, या संदर्भात मार्गदर्शन व सूचनांच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाकडून नगरपंचायतीचा प्रस्ताव पाठविण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. नगर विकास मंत्रालयाने या संदर्भात तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केल्यानंतरही २ वर्षांपासून नगरपंचायतीचा प्रस्ताव पडून आहे.
यामुळे फुलचूर आणि फुलचूरटोला या दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. तसा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. यावर आंदोलनाचा इशाराही माजी जि.प. सदस्य चतुर व ग्रामस्थांनी दिला होता. मात्र, त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी बुधवारपासून (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावर भाजपा जिल्हाध्यक्ष मानकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनाला भाजपचे समर्थन जाहीर केले. यावेळी माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, गजेंद्र फुंडे, मनोज मेंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.