बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नियमित ग्राहकांना एक पैसा जमा करण्याची आणि पैसे काढण्यापुरतीच सेवा मिळत असून, या कामासाठी सुद्धा तासनतास रांगेत उभे रहावे लागते. कारण बँकेत येणारे कर्मचारी मर्जीने येतात आणि मर्जीने जातात. वेळेवर कोणी ग्राहक आला तरी कर्मचारी जसे म्हणेल तशी वाट बघावी लागते. तर बघता-बघता वेळ झाल्याचे सांगून पैसे जमा करणे किंवा काढण्यास मनाई केली जाते. अशात अनेक वेळा ग्राहकांना मोठा फटका बसतो.
कोणत्याही योजनेचा कसलाही लाभ नाही
शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजना, पीक विमा योजना व विविध शेती उपयोगासाठी साहित्य खरेदीवर मिळणारे कर्ज या बँकेतून कधीच मिळत नाही. त्याचबरोबर शेळी, म्हैस, गाय व वराह पालनासाठी अनेक आदिवासी बेरोजगार युवक-युवती नेहमी बँकेच्या चकरा मारत असतात; परंतु त्यांना निराशा होऊन परत जावे लागे. केंद्र शासनाने बेरोजगार युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजना सुरू केली आहे. या योजनेला आज ६ वर्षे लोटले तरी या बँकेतून मुद्रा योजनेचा लाभ तालुक्यातील लोकांना मिळताना दिसत नाही. याशिवाय शासनाच्या अनेक योजना ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी बँकेमार्फत चालविल्या जातात; परंतु बँक ऑफ महाराष्ट्रात कोणत्याही योजनेला प्रदर्शित करणारे फलकसुद्धा लावले जात नाही. कोणी विचारणा केली, की त्याबद्दल कधीच समाधानकारक उत्तर मिळत नाही.