मृग जातोय कोरडा : हवामान खात्याचा अंदाज ठरला फोलविजय मानकर सालेकसायंदा पाऊस सरासरीपेक्षाही जास्त पडणार असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. एवढेच नाही तर दरवर्षीच्या पावसाच्या आगमनाच्या एक आठवडा आधी मान्सून भारतात येऊ शकतो, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी कामाची लगबग वाढविली होती, पण ती सर्व कामे आटोपलो, मृग लागून दहा दिवस लोटले तरी मृगधारा बरसल्या नाहीत. यामुळे शेतकरी वर्गाचा हिरमोड होताना दिसत आहे. यंदा मृग नक्षत्राच्या पावसाचे वाहन बेडूक आहे आणि बेडूक हा भरपूर पावसाचे प्रतिक असतो, असे मानले जाते. परंतु बेडून पावसाची वाट बघताना मृग नक्षत्र ओसरत चालले आहे. तरीसुध्दा पावसाची दमदारपणे हजेरी लागण्याची शक्यता दिसत नाही.शेतकरी वर्ग हा पावसाच्या नक्षत्रांना गृहीत धरून आपली शेतीची कामे आणि वेळेचे नियोजन करीत असतो. नियोजनाप्रमाणे सर्व शेतकरी साधारत: अक्षय तृतीयेपासून आपल्या शेतीच्या चिंतेत लागतो. यात शेतखत टाकणे, बियाणे टाकण्यासाठी जातीची वाणाची निवड करणे, शेतीची साफ सफाई करणे पार धुरे व्यवस्थीत करणे यासह अनेक छोटी-मोठी कामे करतो याचबरोबर शेतीची औजारे, नांगर, वखर, दतार, बैल, रेडे आदी सर्व आवश्यक साधनासह स्वत:ला सुसज्ज करीत असतो. साधारणत: दरवर्षी २४ मे ला रोहीणी नक्षत्र सुरू होते. तेव्हापासून पेरणी पूर्व मशागत करण्याला सुरूवात केली जाते. एकीकडे नवतपा जोरात असला तरी शेतकरी रखरखत्या उन्हात आपल्या कामाला अविरत सुरूवात करतो. दरवर्षी ७ किंवा ८ जूनला मृग नक्षत्र लागताच पेरणीला सुरूवात केली जाते. ज्या शेतात आधीच नांगरणी केलेली असते. त्या शेतात पेरणीची कामे सोयीस्कर असतात. परंतु नांगरणी नसलेल्या शेतात पावसाची वाट बघावी लागते. पावसाळ्याच्या कालावधी लक्षात घेतला तर दरवर्षी मान्सून हा १ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर येऊन धडक देतो. त्यानंतर दहा-बारा दिवसात १० ते १२ जूनपर्यंत देशाच्या इतर भागात हजेरी लावतो. विदर्भात सुध्दा १२ ते १६ जूनपर्यंत एक पाऊस दमदार हजेरी लावून टाकतो. त्यापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस सुध्दा धडक देऊन जातो. हे कालमान मृग नक्षत्राच्या मधले कालमान असून मान्सूनची आगमनाची वेळ आणि शेतकऱ्यांचा मृग नक्षाचा अंदाज एकमेकाला समन्वय साधणारा ठरतो. परंतु मागील काही वर्षात हे समन्वय व संतुलन बिघडताना दिसून येत आहे. वैज्ञानिक आधारावर माहिती देणारे हवामान खाते सुध्दा खात्रीपूर्वक माहिती देण्यात अपयशी ठरत आहे. मागील आठवड्यात मान्सून केरळात दाखल झाला. तो ही सरासरी चार-पाच दिवस उशीरा, परंतु नंतर लगेच त्याचा जोर ओसरला. आतापर्यंत अरबी समुद्रात मान्सूनची धडक न दिल्याने महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून केव्हा दाखल होईल हे खात्रीपूर्वक सांगणे कठीण झाले आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पाऊस काही प्रमाणात पडला तर सौभाग्य समजावा अन्यथा मृग नक्षत्राचा वाहन बेडून आतुरतेने वाट पाहत असून पाऊस येतात आपला टर टर ऐकविण्यासाठी सज्ज आहे. त्याची प्रतीक्षा केव्हा संपेल हे सांगता येत नाही.
बेडकाला मृगधारेची प्रतीक्षा
By admin | Updated: June 17, 2016 02:04 IST