सालेकसात सर्वाधिक : देवरी, तिरोड्यावर अवकृपा कायमगोंदिया : आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या जिल्हावासीयांना अखेर शुक्रवारी (दि.१७) दिलासा मिळाला. सायंकाकाळी आणि रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात पडला. आठही तालुक्यांत वरुणराजाने हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी १३.७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे शेतीची कामे वेग धरणार असल्याचेही दिसून येत आहे. यंदाच्या उन्हाळ््याने तसेच पाण्याच्या टंचाईने जिल्ह्यात कधी नव्हे ती परिस्थिती निर्माण झाली होती. ४५ डिग्रीच्यावर गेलेल्या उन्हाचा तडाखा सर्वांना होरपळून सोडणारा ठरला. यात जून महिना लागूनही पाऊस न बरसल्याने तापमान चाळीशीच्या वरच होते. त्यामुळे अंगाही लाहीलाही काही कमी झाली नव्हती. शिवाय जून अर्धा लोटूनही पाऊस बरसला नाही त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला होता. रबीने दगा दिला. त्यात आता खरिप हातून जाणार तर नाही ना, या चिंतेत ते अडकले होते. शुक्रवारी (दि.१७) वरूणदेव जिल्ह्यावर खुश झाले व त्यांनी आपली हजेरी लावली. दुपारी अचानकच पावसाने हजेरी लावून सर्वांना खूश करून टाकले. त्यानंतर रात्रीही पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील आठही तालुक्यांत या पावसाची नोंद घेण्यात आली असून या पावसामुळे सर्वांनाचा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शेतकरी आता आपल्या कामासाठी लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी सकाळीही शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे आता पाऊस नियमीत बरसणार असल्याचे वाटत होते. त्यानंतर मात्र दिवसभर पावसाने उघाड दिली. त्यामुळे पुन्हा उकाड्याने नागरिकांना हैरान व्हावे लागेल. अशात आता तरी बरसत राहा अशी प्रार्थना केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
वरूणराजाच्या आगमनाने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा
By admin | Updated: June 19, 2016 01:36 IST