हड्डीटोली परिसर : रस्ते निधींतर्गत ३५ कोटी मंज़ूर
गोंदिया : शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांमुळेच शहरात आणखी एक उड्डाणपूल तयार होत आहे. यासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३५ कोटींच्या निधीस मंजूरीसुद्धा मिळाली आहे. गोंदिया शहरात गेल्या काही वर्षांपासून रेल्वे लाईनवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. बालाघाट मार्गावरील वसंतनगरजवळून या बांधकामाच्या कार्यास सुरूवात होवून स्थानिक तहसील कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याजवळ आता हे काम समाप्त झाले आहे. मात्र या उड्डाणपुलाचे लोकार्पण अजुनही झालेले नाही. यामुळेच शहरातील नागरिकांना उड्डाणपुलाच्या बांधकामानंतरही ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. याचदरम्यान आणखी शहरात आणखी एका उड्डाणपुलाच्या बांधकामास शासनाने मंजूरी दिल्याची बातमी येऊन धडकली आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या मंजूरीसाठी बर्याच आधी प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला २८ मार्च २०१३ रोजी मंजूर केले, त्यासाठी ३५ कोटी रूपये खर्च करण्याच्या तरतुदीस मंजूरी दिली आहे. ही रक्कम केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम जून २०१४ मध्ये सुरू होण्याची शक्यता बांधकाम विभागाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. हा उड्डाणपूल शहराच्या हड्डीटोली परिसरात होणार आहे. तिरोडा मार्ग ते बालाघाट मार्गास जोडण्यासाठी अनेक वर्षांपूर्वी एक रस्ता तयार करण्यात आला आहे. याला शहरातील नागरिक रिंगरोड म्हणतात. या गोंदिया-बालाघाट मार्गापासून मरारटोलीकडून एका बायपास रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या रस्त्यावर हड्डीटोली ते सिव्हील लाईन-छोटा गोंदियाला जोडण्यासाठी हे उड्डाणपूल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, या उड्डाण पुलाची लांबी १०८ मीटरची राहणार आहे. उड्डाणपुलाचे १८-१८ मीटरचे चार गाळे बनविण्यात येतील. दोन्हीकडे दोन-दोन गाळे राहतील. उड्डाणपुलाच्या मध्यभागी ३० मीटरचा एक गाळा राहील. अशाप्रकारे उड्डाणपुलात पाच गाळे बनविले जातील. याशिवाय उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस अॅप्रोच मार्ग तयार केले जातील. जून २०१४ मध्ये या उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्याची योजना आहे. परंतु पावसाळा बघता या कालावधीत हे काम सुरू होवू शकेल का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. निविदा प्रक्रिया आताही होवू शकली नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे गोंदिया शहराची सुरक्षा लक्षात घेवून पूर्वी बायपासचे बांधकाम केले जात आहे. या अंतर्गत गोंदिया-बालाघाट मार्गापासून ते गोंदिया-आमगाव मार्गाला व गोंदिया-नागपूर मार्गाला जोडण्याचे काम सुरू आहे. परंतु यात सर्वात मोठी अडचण म्हणजे रेल्वे क्रॉसिंगवरून उड्डाणपुलास मंजूरी न मिळाल्याने होत होती. उड्डाण पुलाच्या मंजूरीने आता या बांधकामात येणार्या सर्व समस्या दूर होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)