अर्जुनी-मोरगाव : महागाव वितरण केंद्रांतर्गत लाईनमन ईश्वर चंद्रभान निंबार्ते यांना विद्युत खांबावर काम करीत असताना विजेचा धक्का लागला. उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. महावितरण उपविभाग अर्जुनी-मोरगाव तर्फे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. मात्र अद्यापही त्यांना अटक व कारवाई करण्यात आली नाही. महिना लोटूनही विद्युत निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. मोरगाव येथे विद्युत खांबावर काम करीत असताना लाईनमन ईश्वरला विजेचा धक्का लागला. यात तो भाजला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रथमदर्शनी कनिष्ठ अभियंता मोदनकर व लाईनमन भक्ते यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. लाईनमन भक्ते यांना निलंबित करण्यात आले. १५ मे रोजी देवरीचे कार्यकारी अभियंता वाकडे तसेच १६ मे रोजी महावितरण नागपूरचे वरिष्ठ अधिकारी मराठे यांनी मृतकाच्या घरी जावून कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात कनिष्ठ अभियंता मोदनकर, लाईनमन भक्ते व सहाय्यक लाईनमन चौधरी हे दोषी असून अद्यापही त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. महावितरणतर्फे याप्रकरणी अत्यंत संथगतीने चौकशी सुरू आहे. विद्युत निरीक्षकांचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. महिना लोटला तरी अहवाल प्राप्त झाला नसल्याने कुठे तरी पाणी तर मुरत नाही ना? अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, छायाचित्र तसेच इतर दस्तावेजांची मागणी केली आहे. पोलीस विभागातर्फे त्यांना माहिती पुरविण्यात आली. मात्र महावितरणचा अद्यापही तपास सुरूच आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत कारवाई झाली नाही तर उपोषणावर बसण्याचा ईशारा कुटुंबीयांतर्फे देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
महावितरणच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई थंड
By admin | Updated: May 22, 2015 02:00 IST