लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनाशी दोन हात करता येणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात असतानाही शुक्रवारच्या आकडेवारीनुसार तब्बल १७९३३५ नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून आले आहे. यामध्ये ४५-६० वयोगटातील नागरिकांचा सर्वाधिक समावेश असून तब्बल ६२४३३ नागरिकांनी मुदत संपूनही त्यांच्या दुसरा डोस टोलवला आहे. अशात कोरोनाशी दोन हात कसे करता येणार असा प्रश्न पडतो. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने जास्त कहर केला. खास बाब म्हणजे, दुसरी लाट सुरू होती तेव्हा कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण न झाल्याने दुसऱ्या लाटेने आपला कहर दाखवून दिला. हाती शस्त्र असूनही त्याचा वापर करता आला नाही या दुसऱ्या लाटेतील शोकांतिकाच म्हणावी लागणार आहे. मात्र आता पुढे कोरोनाला पाय पसरू द्यायचे नाही यासाठी शासनाने लसीकरणाला जोर दिला आहे. जिल्ह्यातही लसीकरण वेगात सुरू असताना दिसत आहे. मात्र पहिला डोस घेणाऱ्यांच्या संख्या झपाट्याने वाढत असतानाच दुसरा डोस घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लसीकरणात मुदत संपूनही १७९३३५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही डोस घेणे गरजेचे असून त्याशिवाय कोरोनापासून सुरक्षा नाही, असे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. त्यानंतरी ४५-६० वयोगटातील तब्बल ८२४३३ नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नसून त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचप्रकारे ६० व त्यापुढील वयोगटातील ४३८५७ नागरिकांनी त्यांचा दुसरा डोस टोलवल्याचे दिसून येत आहे. दिसतोय तरुणाईचाही बेफिकीरपणा - दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरुणांचा बळी गेल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर परवानगी मिळताच लसीकरणासाठी तरुणाईच पुढे आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात १८-४४ गटातच मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, या गटातील ५३०४४ तरुणांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नाही. यातून तरुणांचा लसीकरणाला घेऊन बेफिकीरपणा उघडकीस पडत आहे. लसीकरणाची मागणी करणारेच आता लसीकरणाला पाठ दाखविताना दिसत आहेत.
45-60 गटातील 822433 नागरिकांनी टोलवला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST