कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. जिल्ह्यातील आठपैकी पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनासाठी हाॅटस्पाॅट समजले जाणारे तालुकेच आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात असली तरी मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत २२४७२२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २२४४७६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४११९८ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर ४०४९३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
...........
१६०२४४ नागरिकांना दोन्ही डोस
कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वाचे शस्त्र आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सात लाखांच्यावर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी ५६०३१४ नागरिकांना पहिला डोस तर १६०२४४ नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.