देवरी : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता १२ वीची पुरवणी परीक्षा गुरुवारी १६ सप्टेंबरपासून सुरु होत असून गोंदिया जिल्ह्यातून या परीक्षेकरिता केवळ २५ विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्याच्या पाच परीक्षा केंद्रांतून हे विद्यार्थी परीक्षा देणार असून ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने या परीक्षेतही हे विद्यार्थी पास होणार की नाही? याकडे परीक्षार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर बोर्डाने जिल्ह्यात पाच परीक्षा केंद्रे नेमली आहेत. त्यात डी.बी. सायन्स कॉलेज गोंदिया येथे नऊ विद्यार्थी, भवभूती महाविद्यालय आमगाव येथे ३ विद्यार्थी, मनोहरभाई पटेल ज्यु. कॉलेज देवरी येथे ५ विद्यार्थी, सालेकसा ज्यु. कॉलेज सालेकसा येथे ३ तर सीजे पटेल महाविद्यालय तिरोडा येथे ५ असे एकूण २५ विद्यार्थी या १२ वीच्या पुरवणी परीक्षेला बसून ऑफलाइन पद्धतीने पेपर सोडवणार आहेत. यावर्षी कोरोना संसर्ग असल्याने बोर्डाने मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा न घेता मूल्यमापन पद्धतीने १२ वीचा निकाल लावलेला होता. मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्राचा वापर करण्यात आला होता. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. परंतु यामध्ये हे २५ विद्यार्थी नापास झाल्याने त्यांच्यावर पुरवणी परीक्षेस बसण्याची वेळ आली आहे. परंतु या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासही झाला नसल्याने आता या पुरवणी परीक्षेत तीन तास परीक्षा केंद्रावर बसून पेपर सोडवायचे असल्याने या परीक्षेत विद्यार्थी पास होणार की नाही? याकडे परीक्षार्थ्यांच्या पालकांचे लक्ष लागलेले आहे.