देवरी : आदिवासी दुर्गम क्षेत्रात बऱ्याच दिवसांपासून धान खदेरी केंद्रावर खुल्या जागेत पडून असलेल्या १४४ कोटी रुपये मुल्याच्या धानाकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देऊन मिलिंग करीता धानाची उचल करावी, अशी मागणी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशीकचे संचालक भरतसींग दुधनाग यांनी केली आहे.आदिवासी विकास महामंडळ ही महाराष्ट्र शासनाची शासकीय समर्थन मुल्यावर धान खरेदी करणारी एजंसी आहे. महामंडळ ही दुर्गम आदिवासी क्षेत्रात गोदामाच्या अभावामुळे खुल्या मैदानात धानाची खरेदी करुन संग्रहण करीत असते. मागच्या दोन वर्षापुर्वी सुद्धा धानाची उचल व मिलिंग न झाल्याने २०० कोटी रुपयांच्या २० लाख क्विंटल नाधाची नासाडी झाली होती. त्या धानाचा कवडीमोल भावाने लिलाव करण्यात आला होता. जे फार हानीकारक सिद्ध झाले होते. धानाची मिलिंग व परीवहन दर कमी असल्यामुळे राईस मिलधारकांनी धानाची मिलिंग करण्यास नकार दिला आहे. केवळ दोन महिन्यांचे गोदाम भाडे मिळत असल्याने गोदामधारकसुद्धा गोदाम किरायाने देण्यास नकार देत आहेत. सध्याच्या वेळी गोंदिया, गडचिरोली व अहेरी या ठिकाणी एकूण सहा लक्ष क्विंटल खरीप हंगामाची व वर्तमान रबी हंगामाची खरेदी केलेले तीन लाख क्विंटल असे एकूण नऊ लाख क्विंटल धान शासकीय किमतीनुसार १४४ कोटी रुपयांचे असून ते खुल्या मैदानात असुरक्षित ठेवले आहे. मान्सून जवळ असल्याने पावसामुळे धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन धानाची उचल करुन गोदामात सुरक्षित ठेवावे किंवा मिलिंगकरिता पाठवावे, अशी मागणी अदिवासी महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
१४४ कोटींचे धान उघड्यावर पडून
By admin | Updated: May 25, 2015 01:07 IST