पणजी : मान्सूनचा जोर नसला तरी खवळलेल्या समुद्रात उसळलेल्या उंच लाटांनी गेल्या सात-आठ दिवसांतच सुमारे वीस टन कचरा किनाऱ्यांवर फेकला आहे. एकीकडे तेलगोळ्यांनी नाकी दम आणलेला असताना हा कचरा हटविण्याचे मोठे आव्हान पर्यटन खात्यासमोर आहे. पर्यटन संचालक निखिल देसाई यांना विचारले असता, गेल्या काही दिवसांत किनाऱ्यांवरील तीन ते चार टन कचरा काढण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी यंत्रणा अपुरी पडत असल्याचे त्यांनी मान्य केले. किनारे साफ करण्यासाठी वार्षिक १४ कोटी रुपयांचे नवे कंत्राट निश्चित झाले आहे. पुरेसे मजूर मिळणार असल्याने पुढील मान्सूनपासून हा प्रश्न निकालात येईल, असे त्यांनी सांगितले. सध्याचे कंत्राट चार ते पाच वर्षांपूर्वीचे आहे. त्या वेळी किनाऱ्यांच्या व्यापक साफसफाईसाठी भरीव तरतूद नव्हती. १0५ किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर प्रमुख भागातच १२५ मजूर सध्या कचरा गोळा करण्याचे काम करीत आहेत. हे मनुष्यबळ तसे अपुरेच आहे. पावसाळ्यात किनाऱ्यांवरील कचरा हटविण्याचे आव्हान दरवर्षी पर्यटन खात्यासमोर असते. खास करून प्लास्टिक कचरा लाटांबरोबर सतत किनाऱ्याला लागत असतो. नव्या कंत्राटात हा कचरा गोळा करून त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारीही कंत्राटदारावर सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
समुद्रातील लाटांनी आणला २० टन कचरा
By admin | Updated: June 16, 2014 02:01 IST