पर्ये : येत्या दोन वर्षांत राज्य पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण होईल. राज्यात सध्या सुरू असलेल्या जायका प्रकल्पाचे काम साल २0१६ पर्यंत पूर्ण करून जनतेला आठवड्याचे चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केरी, सत्तरी येथे दिली. येथील सपोर्ट डॅम परिसरात सुमारे साडेसहा कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या २.00 एमएलडी पाणी शुध्दीकरण प्रकल्पाचे अनावरण केल्यानंतर केरी युथ क्लबच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ढवळीकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, सरपंच जिवबाराव राणे, मुख्य अभियंते रेगो व इतर मान्यवर उपस्थित होते. ढवळीकर पुढे म्हणाले की, पाण्याचा अपव्यय टाळल्यास गरीब जनतेला मोफत पाणी देणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. जायकासह राज्यात अनेक प्रकल्प सध्या प्रगतिपथावर आहेत, त्यामुळे येत्या दोन वर्षांत राज्य पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होईल, असे ते म्हणाले. प्रतापसिंह राणे यांनी पाण्याचा वापर योग्यरीत्या व आवश्यकतेनुसार करावा, असे आवाहन केले. सरपंच जिवबाराव राणे यांनी नव्या प्रकल्पातील पाणी वितरण व्यवस्थेवर अधिकार्यांनी नियंत्रण ठेवावे, असे आवाहन केले. स्वागत मुख्य अभियंते बोरकर यांनी केले. सूत्रसंचालन नमन सावंत यांनी केले. आरंभी सपोर्ट डॅम परिसरात उभारलेल्या नव्या जलशुध्दीकरण प्रकल्पातील पंपांचे पूजन, तसेच नामफलकाचे अनावरण करून मंत्री ढवळीकर, राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन केले. (प्रतिनिधी)
राज्यात आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी मिळणार
By admin | Updated: May 20, 2014 01:38 IST