पणजी : येत्या मार्चपर्यंत राज्यातील ८० पैकी बहुतांश खनिज लिजांचे नूतनीकरण करण्याचे सरकारने तत्त्वत: ठरविले आहे. २०१२ साली खाणबंदी लागू झाली त्या वेळी ८० खनिज खाणी सुरू होत्या. ज्या खनिज लिजांचे क्षेत्र अभयारण्यांच्या बाहेर आहे आणि ज्या लिजांबाबत कमी प्रमाणात नियमांचा भंग यापूर्वी झाला आहे, अशा लिजांचे नूतनीकरण करून देण्याची सरकारची भूमिका आहे, असे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत सतरा खनिज लिजांचे नूतनीकरण सरकारने केले आहे. लिज करारावरही सह्या झाल्या आहेत. यापुढे आणखी वीस खनिज लिजांचे नूतनीकरण होणार आहे. सरकारला लिजांचे नूतनीकरण केल्याने मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत आहे; पण लिज नूतनीकरण केले गेले तरी, प्रत्यक्षात खाणी सुरू होण्यास विलंब लागेल. नूतनीकरण झालेल्या खाणींपैकी एकही खनिज खाण अजून सुरू होऊ शकलेली नाही. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणविषयक (ईसी) दाखला मिळाल्यानंतरच खनिज खाणी सुरू होणार आहेत. या पुढील जून-जुलैचा पावसाळी मोसमही निघून जाईल व त्यानंतर खनिज खाणी सुरू होऊ शकतात, असे राज्यातील खनिज व्यावसायिकांना वाटते. गोव्याचा खाण व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी केंद्रीय स्तरावरही स्पष्टता नाही, असा अनुभव गोव्यातील खाणमालकांना येत आहे. (खास प्रतिनिधी)
बहुतांश खनिज लिजांचे मार्चपर्यंत नूतनीकरण
By admin | Updated: January 4, 2015 02:29 IST