पणजी : उत्तर व दक्षिण गोव्यात जोरदार पावसाचा मारा सुरूच असून गेल्या २४ तासांत सुमारे ४ इंच वृष्टी झाली आहे. राजधानी पणजीसह राज्यातील सर्व भागांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी दुपारपर्यंत बराच पाऊस पडला. राज्यातील प्रमुख शहरांमधील अनेक रस्ते मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते. सोमवारी सायंकाळी पावसाचा तडाखा सुरू झाला होता. त्यानंतर रात्रभर पाऊस पडला. मंगळवारी दुपारपर्यंत वृष्टी झाली. दि. १ जूनपासून आतापर्यंत मोसमी पाऊस ३५६.४ मिलीमीटर झाला आहे. म्हापसा भागात ६६.० मिलीमीटर, पेडणेत ९०.४ मिलीमीटर, फोंडा १०७.५ मिलीमीटर, जुने गोवे भागात ७२.९ मिलीमीटर, साखळीत ८८.४, वाळपईत ७५.३, काणकोण भागात १४१.६, तर दाबोळी भागात ९७.२ मिलीमीटर वृष्टी झाल्याची नोंद वेधशाळेने आपल्या त्या त्या भागातील केंद्रांद्वारे केली आहे. राज्यात मान्सून आता पूर्णपणे स्थिरावल्याचा अनुभव लोकांना येत आहे. जोराचा पाऊस आल्याने अनेक ठिकाणी नाले भरून वाहू लागले आहेत. राजधानी पणजीत तर पावसाचे पाणी लवकर रस्ते व्यापून टाकत आहे. सत्तरी, सांगे, काणकोण, केपे, पेडणे या तालुक्यांतही मंगळवारी जोरदार पाऊस पडला. (खास प्रतिनिधी)
‘मुसळ’धारा सुरूच
By admin | Updated: June 18, 2014 07:25 IST