पणजी : विकएंडला सलग पाच दिवस सुट्टी मिळाल्याने पर्यटकांनी नाताळ, नववर्षाचे विक्रम मोडत गोव्यात तुफान गर्दी केली. यामुळे किनारी भागात तसेच राजधानी पणजी शहरासह ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन मेगाब्लॉक झाले. स्थिती हाताबाहेर गेल्याने वाहतूक हाताळण्यात पोलीस पूर्ण अपयशी ठरले. याचा फटका स्थानिकांना बसला. तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक देशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. संख्या वाढली आहे; परंतु त्यांना हाताळण्यासाठी पुरेशी सरकारी यंत्रणा नाही तसेच पायाभूत सुविधाही नाहीत आणि त्याबाबत उदासीनता आहे, अशी नाराजी सत्ताधारी आमदारांकडून व्यक्त होत आहे. पणजी वाहतूक विभागाचे निरीक्षक धर्मेश आंगले यांच्याशी संपर्क साधला असता, शनिवारी राजधानी शहरात वाहतूक व्यवस्था नियंत्रणाबाहेर गेल्याचे त्यांनी मान्य केले. एका पाहणीनुसार रोज सरासरी ९0 हजार वाहने शहरात प्रवेश करीत असतात. शनिवारी ही संख्या एक लाखाच्याही वर गेली. ३१ डिसेंबरसारखी स्थिती होती. किनारी भागात पर्यटकांनी तुफान गर्दी गेली होती. कळगुंट व पणजीत मिळून सुमारे ४५0 वाहतूक पोलीस तैनात होते, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
पर्यटकांच्या गर्दीपुढे यंत्रणा अपयशी
By admin | Updated: October 6, 2014 02:03 IST