पणजी : राज्यात सोमवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने राजधानी पणजीसह उत्तर गोव्यात दाणादाण उडविली. विविध भागांमध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अवघ्या तीन-चार तासांत राज्यात ५८.६ मिलीमीटर म्हणजे सुमारे सव्वादोन इंच पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंत संततधार वृष्टी सुरू होती. राज्यात आता मान्सून स्थिरावला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यापासून अशा प्रकारे जोरदार वृष्टी झाली नव्हती. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत एकूण २५७.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सोमवारी सायंकाळी पावसाचा तडाखा एवढा जोरदार होता की, तिसवाडी तालुक्यासह उत्तर गोव्यातील सत्तरी, डिचोली या तालुक्यांतील ग्रामीण भागात पडझड झाली. पर्वरीत महामार्ग क्र. १७वर एक मोठा वृक्ष उन्मळून पडला. दक्षिण गोव्यात मात्र पावसाचा विशेष जोर दिसून आला नाही. सध्या समुद्रही खवळला आहे. रात्रीच्या वेळी अधूनमधून रोज पाऊस पडतो; पण सोमवारी सायंकाळी पावसाने उत्तर गोव्यातील बहुतेक भागांना दोन तासांत झोडपून काढले. पणजीतील सांतईनेज परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. वाहनांच्या रांगा लागल्यामुळे व वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली. पणजीतील बांदोडकर मार्गावर कांपाल येथे पाण्याचा निचरा होण्यास वाव नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. (खास प्रतिनिधी)
पहिल्याच पावसात दैना
By admin | Updated: June 17, 2014 17:49 IST