पणजी : खाणपट्ट्यात भाजपचे आमदार असलेल्या किमान पाच मतदारसंघांमध्ये २0१२च्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही जास्त मतांची आघाडी लोकसभेसाठी भाजपला प्राप्त झाली आहे. खाणपट्ट्यात लोकांनी भाजपला स्वीकारल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही मोदींची लाट की पर्रीकरांचा करिश्मा, याबाबत खुद्द भाजप नेतेही संभ्रमात आहेत. डॉ. प्रमोद सावंत यांच्या मते, पर्रीकर सरकारने खाणबंदीनंतर गृह आधार योजनेचा लाभ खाण भागातील गृहिणींना प्राधान्यक्रमाने दिला. त्यामुळे खास करून महिला वर्ग भाजपच्या पाठीशी राहिला. ट्रकवाल्यांना पॅकेज देऊन काही प्रमाणात सरकारने त्यांनाही दिलासा दिला. राज्यात भाजपचे सरकार आहे व केंद्रातही भाजपची सत्ता आल्यास खाणींचा प्रश्न कायमचा सोडवू, असे आश्वासन भाजपने दिले होते. राज्यात एक आणि केंद्रात दुसरे सरकार असल्यास काय परवड होते याचा अनुभव खाणबंदीची झळ पोचलेल्यांनी घेतला होता, त्यामुळे केंद्रातही भाजपलाच कौल देऊन हा प्रश्न कायमचा मिटतो का पाहू, अशी भावनाही खाणपट्ट्यातील लोकांची असावी. उत्तर गोव्यात खाणपट्ट्यात येणार्या मये मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत अनंत शेट हे ६ हजार मतांनी निवडून आले होते. या वेळी लोकसभा निवडणुकीत श्रीपाद यांना ९ हजार ७८७ मतांची आघाडी येथे मिळाली आहे. साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत हे ७ हजारांच्या मताधिक्क्याने निवडून आले होते. या वेळी लोकसभेसाठी श्रीपाद यांना येथे तब्बल ८७२४ मतांची आघाडी मिळाली आहे. दक्षिण गोव्यात सावर्डे मतदारसंघात गणेश गावकर हे विधानसभेत २ हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. या वेळी नरेंद्र सावईकर यांना लोकसभेसाठी येथे तब्बल ११ हजार ८४३ मतांची लक्षणीय आघाडी मिळालेली आहे. सांगे मतदारसंघात सावईकर यांना ७ हजार ७0५ मतांची आघाडी मिळाली आहे. कुडचडेत नीलेश काब्राल यांच्या मतदारसंघात सावईकर यांना ५ हजार ७८८ मतांची आघाडी मिळाली आहे. केपेमध्येही उलट झाले आहे. या मतदारसंघात सावईकर यांना ११,४८४ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार रेजिनाल्ड लॉरेन्स यांना ९७६३ मतांवर समाधान मानावे लागले. बाबू कवळेकर यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. खाणी पर्रीकरांनीच बंद केल्या हे त्यांच्याच तोंडून ऐकविणारी टेप काँग्रेसने प्रचाराच्या काळात खाण भागात वाजवली; परंतु त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. खाणपट्ट्यातील लोक मोदींच्या लाटेने प्रभावित झाले, की पर्रीकरांनी दिलेल्या कल्याणकारी योजनांमुळे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या मते, हा मोदी लाटेचा प्रभाव आहे, तर आमदार प्रमोद सावंत यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रमाणात मोदी लाट असली तरी पर्रीकरांनी दिलेल्या कल्याणकारी योजनांचा हा करिश्मा आहे. खाणबंदीनंतर पर्रीकरांनी खास करून गृह आधार योजनेचा लाभ खाणपट्ट्यातील असंख्य गरजू गृहिणींना दिला. ट्रकवाल्यांना पॅकेज जाहीर करून दिलासा दिला. संकटाच्या काळात सरकार आपल्याबरोबर राहिले, याची कृतज्ञता म्हणून खाण भागातील मतदारांनी भाजपच्या झोळीत मते टाकली. (प्रतिनिधी)
खाणपट्ट्यात भाजपचे मताधिक्य वाढले
By admin | Updated: May 20, 2014 01:39 IST